Jammu and Kashmir : ३७० च्या पार्श्र्वभूमीवर ईद शांततेत, एकही गोळी झाडली नसल्याचे केंद्राचे स्पष्टिकरण

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतरही या भागात बकरी ईद उत्साहात आणि शांततेत पार पडली. जम्मू-काश्मीरमध्ये आज दिवसभरात एकही गोळी झाडण्यात आली नाही, एकही मृत्यू झाला नाही. सुरक्षा दलानेही एकही गोळी झाडली नाही, असं सांगतानाच अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव (नियोजन आयोग) यांनी केलं.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित कंसल यांनी ही माहिती दिली. बकरी ईदच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये वातावरण खराब होऊ नये म्हणून प्रशासनाने पूर्णपणे सावधगिरी बाळगली होती. राज्यातील २० हजार विद्यार्थ्यांनीही ईद साजरी केली, असं सांगतानाच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन त्यांनी केलं. राज्यात सर्व ठिकाणी आरोग्याच्या सुविधा कार्यरत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मौलवी आणि सामान्य नागरिकांशी चर्चा केली होती. त्यामुळेच आज राज्यात ईद उत्साहात आणि शांततेत पार पडली. राज्यात गोळीबार झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. या बातम्या खोट्या असून त्यात काहीही तथ्य नाही, असं कंसल म्हणाले. तर स्थानिक पातळीवर किरकोळ घटना घडल्या. पण त्या अत्यंत कुशलतेने हाताळण्यात आल्या. काही घटनांमध्ये काही लोक किरकोळ जखमी झाले, एवढा अपवाद वगळता काश्मीर खोऱ्यात परिस्थिती नियंत्रणात आहे, असं जम्मू-काश्मीरचे पोलीस उपमहानिरीक्षक एस. पी. पाणि यांनी सांगितलं.