पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खासदार निधीतून ५० लाख देणार : रामदास आठवले

सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खासदार निधीतून ५० लाखांची आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी केली. आठवले यांनी आज कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
कोल्हापूरमधील रांगोळी, कडोली, इंगळी, आंबेवाडी, जाधववाडी आणि कोल्हापूर शहर आदी भागातील पूरग्रस्तांच्या रामदास आठवले यांनी भेटी घेतल्या. त्याचप्रमाणे सांगली जिल्हयातील ब्रह्मनाळ गाव आणि परिसरातील पूरग्रस्तांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेला हा महाजलप्रलय होता. त्यातून या पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक सामाजिक आणि मानसिक पाठिंब्याची; मदतीची गरज आहे. या पूरग्रस्तांच्या पाठिशी आम्ही खंबीर उभे असून सर्वांनी मिळून पूरग्रस्तांच्या पाठिशी उभे राहण्याचे; त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन आठवले यांनी केले.
दरम्यान, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील कोणत्याही भागात पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नदीजोड प्रकल्प महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात सुरू करावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पूरग्रस्तांचे पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजने अंतर्गत पुनर्वसन करता येऊ शकते, या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.