पश्र्चिम महाराष्ट्रात पावसाचे ४० बळी, दोन बेपत्ता : विभागीय आयुक्त

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुण्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त यांनी दिली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
पुरामुळे सांगली १९, कोल्हापुरात ६, सातारा आणि पुण्यात प्रत्येकी ७ आणि सोलापूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर सांगलीत, आणि साताऱ्यात प्रत्येकी एक असे तीन व्यक्ती बेपत्ता आहेत. तर ब्रह्मणाळमध्ये आज ५ मृतदेह सापडल्याचं दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं. कोल्हापुरात २ लाख ४५ हजार २२९ जणांचं स्थलांतर करण्यात आलं असून सांगलीत ४ लाख ४१ हजार ८४५ जणांचं स्थलांतर करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. सांगलीत पाणी ओसरायला सुरुवात झाली असून सांगलीतील पाण्याची पातळी ५६ फुटावरून ५३ फुटावर आल्याचंही त्यांनी सांगितलं. सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख दिले जाणार आहेत. उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.