पांडवकडा दुर्घटना : वाहून गेलेल्या पाच विद्यार्थिनींपैकी एकीचा मृतदेह सापडला, खारघर पोलिसांचा शोध जारी

हवामान खात्याने शुक्रवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि उपनगरात पावसाने चांगलाच वेग घेतला आहे. दरम्यान लोकांना पर्यटनस्थळी न जाण्याचे आवाहन करूनही पर्यटक आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहे. पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला असून पांडवकडा भागात पर्यटकांना जाण्यास बंदी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हि मनमानी पाच तरुणींच्या जीवावर बेतली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई आणि मुंबईतील महाविद्यालयातील तरुण-तरुणींचा एक ग्रुप पांडवकडा परिसरात फिरायला गेला होता. बंदी झुगारुन हे सगळेजण तिथे फिरायला गेले होते त्यावेळीच ही घटना घडली.
दोन दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नवीमुंबई येथील पांडवकडा धबधब्याची पाण्याची पातळी वाढली होती. अशातच पांडवकडा भागात असलेल्या धबधबा परिसरातून पाच तरुणी वाहून गेल्याचे समजताच पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली यापैकी नेहा जैन नावाच्या तरुणीचा मृतदेह सापडला आहे तर इतर तरुणींचा शोध चालू आहे. दरम्यान आज आणि उद्याही मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
खारघर आणि बेलापूर मार्गादरम्यान असणाऱ्या टेकडीला पांडवकडा या नावाने ओळखले जाते. असे अनेक नैसर्गिकरित्या तयार झालेल्या आकर्षक आणि मनमोहक धबधब्यांना भेटी देण्यास पर्यटक जात असतात. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्याचे दिसते. सध्या खारघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
खारघर आणि बेलापूरदरम्यान असलेल्या या टेकडीला पांडवकडा असे संबोधले जाते. पावसाळ्यात या ठिकाणी खाली पावसाचे पाणी पडत असल्याने नैसर्गिक धबधबा तयार झाला आहे. निसर्गाचे हे मोहक रुप अनुभवण्यासाठी पर्यटक या ठिकाणी हजेरी लावत असतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड या ठिकाणच्या पर्यटकांची या ठिकाणी उपस्थिती असते. मात्र अनेकदा या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.