विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना “वश” करण्यासाठी शिवसेनेकडून सेलफोन बॉम्ब !! “एक भाजपात गेले तुम्ही इकडे या …”

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेकडून त्यांना पक्षांतरासाठी वारंवार फोन येत असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. एक विरोधीपक्ष नेता भाजपमध्ये गेला म्हणून दुसरा विरोधीपक्ष नेत्याला शिवसेनेला न्यायचा आहे. वांद्रे येथून आतापर्यंत २५ फोन आले. ते भेटायला बोलावत असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर विजय वडेट्टीवार यांनी खोचक टीका केली आहे. मागील पाच वर्षांत काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ भाजप-शिवसेना सरकारवर आली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे.
या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवर यांनी केली आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचारात भाजपने वारेमाप आश्वासने दिल्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकून सत्ता दिली, परंतु पाच वर्षात त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. या सरकारच्या कार्यकाळात तब्बल १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीचा गवगवा केला, पण आजही 30 लाख शेतकरी लाभापासून वंचित आहेत. पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट करुन मालामाल झाल्या आहेत. त्यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही.
मुद्रा योजनेतून लाखो रोजगार निर्माण झाल्याचा सरकारचा दावाही फसवाच निघाला. बेरोजगारांना नोकरीची आशा लावून त्यांच्या स्वप्नांची सरकारने राखरांगोळी केली आहे. महाजनादेश यात्रा काढणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी याची हिशोब द्यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याशिवाय भ्रष्टाचारात तर हे सरकार आकंठ बुडालेले आहे. समृद्धी महामार्ग घोटाळा, चिक्की घोटाळा, एसआरए घोटाळा, आदिवासी विभागातील घोटाळा, जलयुक्त शिवार योजनेसह अनेक घोटाळे झाले, पण कसलीही चौकशी न करता मुख्यमंत्र्यांनी सर्वांना क्लीनचिट देऊन टाकली. त्या भ्रष्ट मंत्र्यांचा हिशोब जनतेला द्यावा, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे.