Karnatak Political Drama : मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ठोठावले थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे

कर्नाटकमधील राजकीय नाट्य संपायच्या आता पुन्हा याचा गुंता वाढत आहे. काल उलटून गेल्यानंतर आज घडलेल्या नाट्यमय घडामोडीत राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करायला सांगितले होते. पण आता या राजकीय नाट्याने वेगळेच वळण घेतले आहे. राज्यपाल विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार घेऊन कुमारस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रालाच कुमारस्वामी यांनी आक्षेप घेतला आहे. ‘राज्यपाल विधानसभा अध्यक्षांना त्यांच्या कामकाजाविषयी आदेश देऊ शकत नाहीत,’ असं कुमारस्वामी यांचं म्हणणं आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिलेल्या अनेक डेडलाइन्सवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांना आदेश देणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयाच्या विरोधी आहे, असं कुमारस्वामी यांनी याचिकेत म्हटलं आहे.
कर्नाटकच्या बंडखोर १५ आमदारांवर विधानसभेत उपस्थित राहण्यासाठी दबाव आणता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने १७ जुलै रोजी म्हटलं होतं. याचं स्पष्टीकरणही कुमारस्वामी यांनी न्यायालयाकडे मागितलं आहे.