भाजप-सेना युती : चंद्रकांत पाटील म्हणतात ” ठरलं काहीच नाही !!”

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलाच नसल्याचा दावा, चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात बदलले आहे. लोकसभेतील बंपर यशामुळे भाजपा आणि शिवसेनेला हुरूप आला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातही भाजपामध्ये विरोधी पक्षामधून जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. त्यामुळे शिवसेनेशी युती करण्याची गरज नाही, असे मानणाराही एक मतप्रवाह भाजपामध्ये आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ”भाजपा आणि शिवसेना युतीचा आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. तसेच जागावाटप करताना याधीच्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा सोडल्या जाणार नाहीत.”त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामधून युतीच्या भवितव्याबाबत सूचक अर्थ काढला जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करणे हे आपले एकमेव लक्ष्य असून काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक लवकरच भाजपमध्ये आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, असा गौप्यस्फोट भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केला होता. तसेच प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा दावा तुम्ही मागे घेतला का, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले की, आपापलं काम करत राहायच असतं. तुम्हाला अनपेक्षीतपणे पद मिळत असतात. अध्यक्षपदी विराजमान होईल याची आपल्याला जाणीवही नव्हती. पाच वर्षांपूर्वी मी भाजप अध्यक्ष होणार म्हणून मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी शपथविधीच्या दिवशी फोन आला आणि, मंत्री व्हायचं सांगण्यात आले. त्यावेळी ठरवलं सरकारमध्ये जायचं तर सरकारमध्ये किंवा अध्यक्ष व्हायच तर अध्यक्ष असं पाटील म्हणाले.