विधानसभा डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेची शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर नौटंकी : खा. नवनीत राणा यांची टीका

विमा कंपन्यांविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं काढलेल्या मोर्च्यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे. ‘शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष नाटक करत आहेत. राज्यात कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे,’ असा आरोप करत नवनीत राणा यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
‘जे सत्तेत राहून शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही ते रस्त्यावर उतरून नाटक करत आहेत. त्यामुळे आता बनावट खत कंपन्यांवर कारवाई करण्याकरता केंद्र सरकारने नियंत्रण समिती स्थापन करावी,’ अशी मागणीही खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत करताना विलंब करत असल्याचा आरोप करत शिवसेना आज रस्त्यावर उतरली. वांद्रे-कुर्ला संकुलातील भारती अँक्सा या खाजगी विमा कंपनीच्या मुख्यालयावर हा महामोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांची पीक विमा योजनेत आर्थिक फसवणूक करणाऱ्या सर्व खासगी विमा कंपन्यांच्या विरोधात हा मोर्चा होता, अशी शिवसेनेची भूमिका आहे.
‘बँक आणि विमा कंपन्यांनी १५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांची कामे मार्गी लावावीत. शिवसेनेचा स्टंट आहे म्हणणाऱ्यांनो निदान एक गोष्ट लक्षात घ्या शिवसेना शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढते,’ असं म्हणत या मोर्च्यात विमा कंपन्यांसह विरोधकांवर निशाणा साधला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या वतीने अर्जुन खोतकर, राहुल शेवाळे, अनिल परब, आमदार सुभास साबणे यांच्यासह ८ जणांच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भारती एक्सा जनरल इन्शूरन्स कंपनीला निवदेन दिलं आहे.