ICC World Cup 2019 : भारताचा ३१ धावांनी पराभव; इंग्लंडचं आव्हान कायम

वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला ३१ धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. इंग्लंडने दिलेल्या ३३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ६ विकेट्सच्या मोबदल्यात ५० षटकांच्या अखेरीस ३०६ धावा करता आल्या. रोहित शर्मानं साकारलेली शतकी खेळी व्यर्थ ठरली. रोहितने १०९ चेंडूत १०२ धावांची खेळी साकारली. यात १५ चौकारांचा समावेश होता.
इंग्लंडच्या डोंगऱ्याऐवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली होती. केएल राहुल शून्यावर माघारी परतला. त्यानंतर कोहलीने कर्णधारी खेळी करून रोहितच्या साथीने भारताचा डाव सावरला. पहिल्या विकेटसाठी कोहली आणि रोहित यांनी शतकी भागीदारी रचली. जोस बटलरने पॉईंटवर कोहलीचा झेल टीपला आणि भारताला धक्का बसला.
कोहली ६६ धावांवर बाद झाला. विजय शंकरच्या जागी संधी मिळालेल्या ऋषभ पंतने ३२ धावा केल्या. हार्दिकने ३३ चेंडूत ४५ धावा ठोकून सामन्यात रंग आणला होता. मात्र टीम इंडियाला पुनरागमन करता आलं नाही. इंग्लंडच्या खेळाडूंनी दमदार क्षेत्ररक्षण केलं. धोनी ४२ तर केदार १२ धावांवन नाबाद राहीला.
इंग्लंडच्या जॉनी बेअरस्ट्रो सामानावीराचा मानकरी ठरला. बेअरस्ट्रोने १११ धावांनी तुफान खेळी साकारली. तर जेसन रॉयने ६६ धावांचं योगदान दिलं. अष्टपैलू बेन स्टोक्सनं अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत ५४ चेंडूत ७९ धावा कुटल्या आणि संघाला तीनशे धावांच्या पार नेलं.