Bihar : चमकी तापाने त्रस्त नातेवाईकांनी दिल्या नितीश कुमार यांच्या विरोधात घोषणा, बळींची संख्या १०८ वर

बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये चमकीतापाने थैमान घातल्यानंतर तब्बल १८ दिवसांनी मुख्यमंत्री नितीश कुमारयांनी स्थानिक रुग्णालयांना भेट दिली. यावेळी रुग्णांच्या नातेवाइकांनी नितीश कुमार ‘परत जा’ च्या घोषणा दिल्या. चमकी तापाचे १०८ बळी गेल्यानंतरही रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेतली जातनसल्यामुळे, त्यांना योग्य उपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांचे कुटुंबीय संतप्त आहेत. दरम्यान चमकी तापाला आळा घालण्यासाठी नितीश कुमार येत्या काळात काय पाऊलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बिहारमध्ये चमकी तापाने थैमान घातलं आहे. मुजफ्फरपूर आणि बदरपूरमध्ये या तापापायी १०८ बालकांचा जीव गेला आहे. पण या तापाला आळा घालण्यामध्ये बिहार प्रशासनाला सपशेल अपयश आलं आहे. त्याचवेळी रुग्णांना सरकारी रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. औषधं, उपचार, अन्न साऱ्याचीच रुग्णालयांमध्ये वानवा आहे.
नितीश कुमार यांनी या सगळ्या परिस्थीतीकडे बराच काळ कानाडोळा केल्यामुळे त्यांच्यावर जहरी टीका करण्यात येत होती. १०८ मुलांचा मृत्यू झाला नसून सरकारने त्यांची हत्या केली आहे असा आरोप विरोधी पक्ष नेत्या राबडी देवींनी केला आहे. अखेर नितीश कुमार यांनी आज मुजफ्फरपूर येथील रुग्णालयांना आज भेट दिली.
मुख्यमंत्री येणार म्हणून रुग्णालयांचा चेहरामोहरा पालटला. सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. पण या सगळ्यात रुग्णांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे रुग्णांच्या संतप्त नातेवाइकांनी कुमार येताच निदर्शनं करणयास सुरुवात केली. इतके दिवस आला नाहीत मग आज कशी काय जाग आली असा सवालही त्यांनी नितीश कुमार यांना केला.