ICC World Cup 2019 : पावसामुळे सामनाप्रेमीच्या आनंदावर पडले विरजण , भारत -पाक सामन्यांवरही पावसाचे संकट

ICC World Cupमध्ये यंदा पावसामुळं तब्बल चार सामने रद्द झाले. याआधी पहिला सामना 7 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला होता. त्यानंतर सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रद्द झाला, हा सामना केवळ 7.3 ओव्हर खेळला गेला होता. त्यानंतर श्रीलंका-बांगलादेश यांच्यातला सामना रद्द झाला होता. त्यात गुरुवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाही आता रद्द झाल्यामुळं चाहते आयसीसीवर संतापले आहेत. जर पावसामुळं सामने रद्द होणार असतील तर, खेळाडूंनी का खेळावे असा सवाल चाहते विचारत आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना नाणेफेक न होताच रद्द झाला. त्यामुळं दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला. त्यामुळं आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे ते वर्ल्ड कपमधल्या महामुकाबल्याकडे. रविवारी भारताचं पुढील सामना कट्टर वैरी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळं या सामन्याला जर पावसाचा फटका बसला तर, चाहते चांगलेच निराश होणार आहेत. पण हवामान खात्यानं दिलेला अंदाज काही तरी वेगळचं सांगत आहे.
भारत आणि पाकिस्तान सामन्याआधी क्रिकेट फॅन्सना मोठा फटका बसणार आहे. आताच्या हवामानानुसार मॅंचेस्टरमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता, पावसाची शक्यता 50 % आहे. मॅंचेस्टरमध्ये सकाळपासून-संध्याकाळपर्यंत पाऊस वर्तवण्यात आला आहे. 16 जूनला म्हणजे सामन्यादिवशी दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे. सकाळी 9, 11 आणि दिवसभरात तीनवेळा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सगळ्यात वाईट बातमी म्हणजे इंग्लंडमध्ये जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस हा मॅंचेस्टर शहरात पडला आहे. त्यामुळं या सामन्याला पावसाचा फटका बसणार असे चित्र दिसत आहे.
पावसामुळं रद्द झालेल्या सामन्याचा फटका काही संघांना लीग राऊंडच्या शेवटी बसू शकतो. एवढचं नाही तर भारताच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यालाही पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं आयसीसीवर टीका होताना दिसत आहे. पावसामुळे सामने रद्द होत असल्यास राखीव दिवस का ठेवण्यात आला नाही, असा सवालही चाहतेही विचारत आहेत. यावर आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी, ”प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवले तर स्पर्धा लांबली असती. आणि त्याचा फटका खेळपट्टीची तयारी, संघाला दुखापतीतून सावरण्याचा मिळणारा वेळ, राहण्याची सुविधा, पर्यटकांचा प्रवासाचा खर्च, या सर्वांना बसला असता. तसेच राखीव दिवशीही पाऊस पडणार नाही याची काय गॅरेंटी?”, असे स्पष्टीकरण दिले आहे.