धक्कादायक ! इफ्तार पार्टीला न बोलावल्याच्या रागातून तीन चिमुकल्यांना घातल्या गोळ्या

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरात रोजा इफ्तार पार्टीचं निमंत्रण न दिल्याच्या रागातून तीन लहान बालकांचा गोळ्या घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपहरण करुन या बालकांचा गोळी घालून निर्घूण खून करण्यात आला, त्यानंतर या तीन बालकांचा मृतदेह पाण्याच्या हौदात टाकून देण्यात आला होता. या प्रकरणात हलगर्जी दाखवल्याने प्रशासनाने दोन पोलिसांचं निलंबन केलं आहे, एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अन्य दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालं आहे. या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
या वृत्तात आहे कि, उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे पीडित कुटुंबाने इफ्तार पार्टीचं आयोजन होतं. पार्टीनंतर घरातील लहान मुलं खेळण्यासाठी बाहेर गेली. रात्री साडेनऊच्या सुमारास हाफिज यांची आठ वर्षीय मुलगी अलीबा, आलम यांची सात वर्षीय मुलगी आसमा आणि हसीन यांचा आठ वर्षीय मुलगा अब्दुल हे अचानक बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी शोधाशोध केली पण काहीही उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी पोलीस स्थानकात लेखी तक्रार केली पण ड्युटीवरील पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने न घेता वरिष्ठांनाही कोणतीच माहिती दिली नाही. शनिवारी सकाळी तिघांचे मृतदेह घरापासून सात किमी अंतरावर धतूरी गावाच्या एका हौदात आढळून आले. तिघांवरही गोळीबार करण्यात आल्याचं समोर आलं, घटनेमुळे खळबळ उडाल्यानंतर तातडीने घटनास्थळी हजर झालेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
पीडित कुटुंबाच्या घरी शुक्रवारी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीसाठी मामेभाऊ मलिक याला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. यामुळे रागावलेल्या मलिकने आपल्या दोन मित्रांच्या सहाय्याने(बिलाल आणि इमरान) तिन्ही बालकांचं अपहरण केलं आणि गोळी घालून त्यांची निर्घूण हत्या केली. याप्रकरणी हलगर्जी दाखवल्याने दोन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर मलिक याला अटक करण्यात यश आलं असून अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.