loksabha 2019 : मोठे अपयश पदरी पडल्याने काँग्रेस नेत्यांचे पदांचे राजीनामे

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झालं आहे. स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील पराभवाची जबाबदारी घेत अभिनेते राज बब्बर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. बब्बर यांच्यापाठोपाठ ओडिशाचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही पदाचा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला दणदणीत यश मिळाल्यानं काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत.
काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अनेक राज्यांमध्ये तर काँग्रेसला खातंही खोलता आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून त्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला आहे. स्वत: राज बब्बर हे सुद्धा फतेहपूर सिक्रीतून पराभूत झाले आहेत. भाजप उमेदवार राजकुमार चाहर यांनी बब्बर यांचा तीन लाखाच्या मताधिक्याने पराभव केला आहे. राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अमेठीचे जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीही जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे त्यांचा राजीनामा सादर केला आहे.