प्रचाराची रणधुमाळी संपली , रविवारी ५९ जागांसाठी मतदान ,९१८ उमेदवारांची परीक्षा

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीशमली असून, अखेरच्या ७ व्या टप्प्यातील मतदान रविवारी होणार आहे. देशभरात ८ राज्यातील ५९ जागांवर १९ मे रोजी मतदान होणार आहे. अखेरच्या टप्प्यासाठीचा निवडणूक प्रचार शुक्रवारी सायंकाळी संपला. शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेश (१३), पश्चिम बंगाल (९), पंजाब (१३), बिहार (८), झारखंड (३), हिमाचल प्रदेश (४), मध्य प्रदेश (८) आणि चंदीगड (१) या राज्यांमध्ये मतदान होणार आहे.
चंदीगडसह अन्य राज्यांमधील निवडणूक प्रचार आज संपला असला, तरी पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान उसळलेल्या हिंसाचाराची दखल घेऊन निवडणूक आयोगाने प्रचाराच्या वेळेत कपात करून तो गुरुवारी सायंकाळी संपवण्याचे निर्देश दिले. रविवारी होणाऱ्या मतदानात ९१८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात रविवारी मतदान होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी वाराणसीमध्ये भव्य रोड शो केला होता. वाराणसी येथे काँग्रेसकडून अजय राय आणि महागठबंधनकडून शालिनी यादव निवडणूक मैदानात आहेत. याच मतदारसंघातून बीएसएफचा माजी जवान तेजबहादूर यादव यांनीही उमेदवारी दाखल केली होती. मात्र, त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली.
रविवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल, त्यांची पत्नी हरसिमरत कौर, केंद्रीयमंत्री हरदीप पुरी, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग बादल यांची पत्नी प्रणीत कौर, हिमाचल प्रदेशमधून खासदार अनुराग ठाकूर, झारखंडमधून माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, चंदीगडमधून माजी केंद्रीयमंत्री पीके बंसल, खासदार किरण खेर, पंजाबमधून अभिनेता सनी देओल, सोम प्रकाश, गोरखपूर येथून अभिनेता रवि किशन, पाटणा साहिबमधून केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद, अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचे नशीब मतपेटीत बंद होणार आहे.