मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास ३७० कलम हटवू : अमित शहा

‘नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यास काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटविण्यात येईल,’ असे आश्वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी दिले. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ‘जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान हवा, अशी मागणी केली आहे. तर काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात ‘अफ्स्पा’ कायद्याचा फेरआढावा घेऊन देशद्रोहाच्या तरतुदीत दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास कलम ३७० निश्चितपणे हटविण्यात येईल,’ असे शाह म्हणाले.
‘केंद्रात पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे सरकार असताना पाकिस्तानने पाच भारतीय सैनिकांचा शिरच्छेद केला होता. परंतु, तत्कालीन सरकारने काहीही प्रत्युत्तर दिले नाही. मोदी सरकारच्या काळात बालाकोटमध्ये हवाई हल्ले करून जशास तसे उत्तर देण्यात आले. काँग्रेसचे एक नेते सॅम पित्रोदा तर हवाई हल्ल्याऐवजी आपल्याला दहशतवाद्यांशी चर्चा करायला हवी, असे म्हणतात. शीख दंगलीबाबत प्रश्न विचारल्यास ‘झाले तर झाले,’ असे काँग्रेस म्हणते. यातून त्यांचे विचार दिसून येतात,’ अशा शब्दांत शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.