राजस्थानातील बलात्काराच्या घटनेवर ‘पुरस्कार वापसी गँग’ गप्प का ? : नरेंद्र मोदी

उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अलवर येथे घडलेल्या सामूहिक बलात्कारकांडाचा उल्लेख करत काँग्रेस तसेच ‘पुरस्कार वापसी’ करणाऱ्या बुद्धिवादी वर्गावर जोरदार शब्दांत निशाणा साधला. पाच वर्षांच्या कार्यकाळात आमच्या सरकारने महिलांना मान-सन्मान, आदर दिला. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यासाठी कायद्यात फाशीची तरतूद करण्यात आली मात्र, महिला सुरक्षेसाठी काँग्रेस नेमकं काय करत आहे, हे राजस्थानमधील घटनेमुळे देशानं पाहिलं आहे. तेथील काँग्रेस सरकारने लोकसभा निवडणुकीमुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप मोदींनी काँग्रेसवर केला.
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून अनेक साहित्यिकांनी ‘पुरस्कार वापसी’ केली होती. त्यांचा उल्लेख पंतप्रधानांनी ‘पुरस्कार वापसी गँग’ असा केला. अलवरमध्ये इतकं अमानुष कृत्य घडलं असताना त्यावर ‘अॅवॉर्ड वापसी गँग’ गप्प का आहे?, असा सवाल मोदींनी केला. एरव्ही काहीही झालं की मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या या मंडळीच्या मेणबत्त्या आता मात्र विझल्या आहेत, असा टोलाही मोदींनी लगावला.