बालाकोट एअर स्ट्राइक : इटालियन महिला पत्रकाराकडून गौप्यस्फोट, जैशचे लोक मेलेही आणि जखमीही झाले !!

भारतीय सैन्याने बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्याविषयी नेमके किती लोक मारले गेले किंवा जखमी झाले ? याची चर्चा चालू असतानाच फ्रान्सिस्का मारिनो या इटलीच्या महिला पत्रकाराच्या स्ट्रिंजर एशियामध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जैश ए मोहम्मदचे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर मारले गेले आणि जखमी झाले असल्याचे म्हटले आहे . त्यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अजूनही जैशचे ४५ जखमी सदस्य पाकिस्तान लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, असा धक्कादायक गौप्यस्फोट या वृत्तात करण्यात आला आहे.
या वृत्तामध्ये म्हटले आहे कि , भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये आमचं काहीच नुकसान झालं नाही, असा पाकिस्तानचा दावा आहे. त्यांनी ते सिद्ध करण्याच्या प्रयत्नात काही विदेशी पत्रकारांना बालाकोटला नेऊन आणलं आणि अगदी काही दिवसांपूर्वी भारतीय पत्रकारांनीही बालाकोटला येऊन खात्री करावी, असंही सांगितलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर या इटालियन पत्रकाराच्या रिपोर्टमध्ये भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये जैशचे १३० ते १७० सदस्य मारले गेले आहेत, असे म्हटले आहे.
फ्रान्सिस्का मारिनो पत्रकार आणि लेखिका असून त्यांनी यांनी Stringer Asia मध्ये २६ फेब्रुवारी झालेल्या बालाकोट एअरस्ट्राइकसंदर्भात सविस्तर वृत्तलेख लिहिला आहे. ‘एअरस्ट्राइकमध्ये १३०ते १७० जण मृत्यूमुखी पडले. काही जण जागीच ठार झाले, तर काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एअरस्ट्राईकमध्ये ठार झालेल्यांमध्ये ११ प्रशिक्षकांचा समावश होता. ते बाँब कसा बनवायचा यापासून ते शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देणारे होते. यातले दोन प्रशिक्षक अफगाणिस्तानचे होते’, असं मारिनो यांनी त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे.
ज्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांना मदत म्हणून काही रोख रक्कमही जैश ए मोहम्मदकडून देण्यात आली. त्यांनी या सदस्यांच्या मृत्यूची जाहीर वाच्यता करू नये, यासाठी हे पैसे देण्यात आल्याचं मारिनो यांनी नमूद केले आहे . सूत्रांचा हवाला देत त्यांनी लिहिलंय की, बालाकोटच्या त्या तळावर बाँबहल्ला झाल्यानंतर अडीच तासांनी तिथे पाकिस्तानी लष्कराची एक तुकडी पोहोचली. बालाकोटपासून २० किमी अंतरावर शिंकियारी नावाच्या गावात हा तळ असल्याचे या पत्रकार महिलेने नमूद केले आहे.
आपल्या सविस्तर वृत्तलेखात त्यांनी लिहिले आहे कि , ‘पाकिस्तानच्या लष्कराची तुकडी बालाकोटच्या तळावर पोहोचल्यावर तातडीने जखमींना लष्करी डॉक्टरांकडे सोपवण्यात आले . जखमींना हरकत उल मुजाहिदीनच्या तळावर उपचारासाठी नेण्यात आले . तिथे हे पाक लष्करातले डॉक्टर उपस्थित होते. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जखमींपैकी ४५ जण अजूनही तिथे उपचार घेत आहेत. दाखल झालेल्यांपैकी २० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला’, असं त्यांनी लिहिलं आहे.