सततच्या छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, दोघांना अटक

सततच्या छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने सोमवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील ही घटना आहे. याप्रकरणी दोन तरुणांवर विनयभंग आणि पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे .
वैष्णवी अशोक लव्हारे, १६ असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे. नुकतीच तिने दहावीची परीक्षा दिली होती. गावातील अमित साहेबराव माने ,१९ हा रोहन गोविंद फड,१९ याच्या मदतीने वैष्णवीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. सातत्याने बाईकवरून तिच्यामागे चकरा मारून पाठलागही तो करत होता.हे दोघंही इथंवरच थांबले नाहीत. त्यांनी वैष्णवी आणि तिच्या वडिलांना धमक्या देत मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. अखेर या त्रासाला कंटाळून वैष्णवीने सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घरामध्ये गळफास घेतला. वैष्णवीचे वडील अशोक अंबाजी लव्हारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात अमित माने आणि रोहन फड या दोघांवर विनयभंग आणि पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.