भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, १५० ते २०० जागा मिळतील , एच.डी. देवेगौडा पंतप्रधान व्हावेत : प्रकाश आंबेडकर

२३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या निकालानंतर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. भाजपाला अंदाजे १५० ते २०० जागा मिळतील असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे . मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकांचे निकाल हे भाजपाला अपेक्षित असे नसतील तर वेगळे असतील असंही मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. भाजपाला १५० ते २०० जागा तर काँग्रेसला १०० जागा मिळतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आणि जर महाआघाडीचे सरकार आले तर माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांना पंतप्रधानपदी निवडले गेले पाहिजे अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली.
शरद पवार, मायावती किंवा ममता बॅनर्जी या तिघांपैकी कोणीतरी एक पंतप्रधानपदासाठी योग्य ठरतील अशी चर्चा विरोधी पक्षांमध्ये सुरू होती. राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार माजिद मेनन यांनीही शरद पवार हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत असं म्हटलं होतं. मात्र या सगळ्या चर्चांबाबत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारच काय राहुल गांधीही पंतप्रधान होऊ शकणार नाहीत असं म्हटलं आहे. तसेच मायावती, चंद्राबाबू नायडू किंवा ममता बॅनर्जी यांनाही पंतप्रधान होता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला शरद पवार यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात असं मत व्यक्त केलं होतं. एवढंच नाही तर निकालानंतर एनडीएतले काही घटक पक्ष महाआघाडीसोबत येतील असेही पवार म्हटले होते. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी हे सगळे अंदाज खोडून काढले आहेत. पंतप्रधानपदासाठी शरद पवार योग्य आहेत असं अजिबात वाटत नाही असं परखड मत त्यांनी व्यक्त करताना ते म्हणाले कि , ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू हेदेखील पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकणार नाहीत असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.