देशात २०१४ नंतर ९४२ स्फोट घडले आणि मोदी म्हणतात एकाही स्फोटाचा आवाज ऐकू आला नाही : राहुल गांधी

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या हल्ल्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात २०१४ नंतर एकाही स्फोटाचा आवाज ऐकू आला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असले तरी प्रत्यक्षात २०१४ नंतर पुलवामा, पठाणकोट, उरी, गडचिरोली यासह ९४२ अन्य स्फोट घडले आहेत.
पंतप्रधानांनी कान उघडे ठेवून या स्फोटांचे आवाज ऐकण्याची गरज आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही गेल्या आठवड्यात स्फोटांवरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले होते. स्मृती भंश वा सवयीनुसार पंतप्रधान गेल्या पाच वर्षांत स्फोट झाले नाहीत, असे म्हणत असतील असा टोला चिदंबरम यांनी लगावला होता. चिदंबरम यांनी स्फोटांची यादीही समोर ठेवली होती.