रामदास आठवले यांनाही बुरखाबंदी अमान्य , घटनाबाह्य मागणी असल्याचे वक्तव्य

श्रीलंका, फ्रान्स व ब्रिटनच्या धर्तीवर भारतातही मुस्लिम महिलांना नकाब आणि बुरखा बंदी करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला आहे. ही मागणीच घटनाबाह्य असून ती मंजूर होऊ शकत नाही,’ असं आठवले यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुरखा व नकाब बंदीची मागणी केंद्र सरकारकडं केली आहे. या मागणीचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत.
एमआयएमचे नेते ओवेसी यांच्यानंतर आठवले यांनीही शिवसेनेची मागणी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. ‘भारत हा सर्वधर्मसमभाव जोपासणारा देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे सर्व धर्मीयांना त्यांची संस्कृती परंपरा जोपासण्याचा समान अधिकार व स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळं सरसकट सर्व मुस्लिम महिलांना बुरखा आणि नकाब घालण्यास बंदी घालण्याची मागणी करणं चुकीचं आहे, असं आठवले म्हणाले.
आठवले पुढे म्हणाले, ‘सुरक्षेसाठी आतंकवाद्यांचा बुरखा फाडला पाहिजे. मात्र, सरसकट सर्वच मुस्लिम महिलांना बुरखा घालण्यास बंदी करणे अन्यायकारक ठरेल. उत्तर भारतात अनेक ठिकाणी हिंदू महिला देखील ज्येष्ठांचा आदर म्हणून चेहऱ्यावर पदर घेत असतात. उन्हात चेहरा झाकण्यासाठी रुमाल, पदर वापरला जातो. त्यामुळं सरसकट बुरखाबंदीची मागणी अयोग्यच आहे.’