अखेर मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित; भारताच्या कुटनीतीचे मोठे यश !

भारतातील अनेक हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कुटनितीला यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (युएनएससी) बुधवारी (दि.१) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे.
संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी यासंदर्भात ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या मंजूर यादीमध्ये मसूद अझहरचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून समावेश करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. युएनएससीत ज्यांनी भारताला साथ दिली त्या सर्वांचे त्यांनी आभारही मानले आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताकडून चौथ्यांदा मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे यासाठी प्रस्ताव मांडला होता. यापूर्वी तीन वेळा चीनने आपला वीटो विशेषाधिकार वापरत या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र, यंदा पुलवामा ह्ल्ल्यानंतर भारताच्या या मागणीला अमेरिका, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पाठींबा दिला. आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनला आपल्या भुमिकेत बदल करत नरमाईची भुमिका घ्यावी लागली. त्यामुळे कायम पाकला पाठिंबा देणाऱ्या चीननेच माघार घेतल्याने पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे.
भारताने यापूर्वी २००९, २०१६, २०१९ मध्ये मसूद अझहरवर बंदी घालण्यात यावी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता. मात्र, यावेळी भारताच्या या प्रयत्नांना यश आले आहे. भारताच्या कुटनीतीचा हा विजय असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता मसूद अझहर पाकिस्तान सोडून इतर कुठल्याही देशात जाऊ शकणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या कुठल्याही सदस्य देशाला मसूदला अर्थपुरवठा किंवा हत्यारं पुरवता येणार नाहीत. यामुळे मसूदची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे कंबरडे मोडले जाणार आहे. मसूदच्या अटकेसाठी पाकिस्तानवर आता दबाव वाढेल किंबहुना पाकिस्तानला त्याच्यावर कारवाई करणे भाग पडणार आहे.