भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या प्रयत्नांमुळेच बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळाला : Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. त्यांनी लोक जनशक्ती पार्टी(लोजपा)चे उमेदवार चिराग पासवान यांच्या मतदारसंघात सभा घेतली. यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. बिहारमध्ये आरक्षणासंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांना योग्य उत्तर देऊ, मोदी असू देत किंवा दुसरं कोणी, कोणीही आरक्षणाला हटवू शकत नाही. काँग्रेसनं आपल्या संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर कशा प्रकारचा व्यवहार केला हे सगळ्यांनाच माहीत आहे. काँग्रेसनं त्यांच्या पराभव करण्यासाठी षडयंत्र रचलं. परंतु आजच्या तरुण पिढीला यासंदर्भात काहीही माहिती नाही. मोदी म्हणाले, काँग्रेस बाबासाहेबांबरोबर कसं वागलं. त्यांना हरवण्यासाठी किती षडयंत्र रचली. स्वतःच्या परिवारातील सदस्याला काँग्रेसनं भारतरत्न दिलं, परंतु ते बाबासाहेबांना विसरले. भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या प्रयत्नांमुळेच बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. आज जग भारताबरोबर उभं आहे, परंतु विरोधक पाकिस्तानसारखेच बोलत आहेत.
भारतातले विरोधी पक्ष हे राजकीय कमी, पण पाकिस्तानचे प्रवक्तेच जास्त वाटतात. जो कोणी भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं, त्यांना योग्य वेळी धडा शिकवू, असंही मोदी म्हणाले आहेत. मग ते नक्षलवाद्यांना समर्थन देणारे असले तरी त्यांची गय केली जाणार नाही. देशाची सुरक्षा, काश्मीर मुद्दा आणि आपले जवान, सुरक्षा यंत्रणांवर विरोधकांकडून होत असलेली टीका देशवासीयांनी विसरू नये आणि निवडणुकीत त्याचा हिशेब करून टाका, विरोधकांना चांगलाच धडा शिकवा, असं आवाहनही मोदींनी केलं आहे.