IPL 2019 : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स विरोधात होम ग्राऊंडवर पहिला सामना गमावला

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स विरोधात आपल्या होम ग्राऊंडवर पहिला सामना ३७ धावांनी गमवत चाहत्यांना नाराज केले. टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय रोहितच्या शिलेदारांनी सार्थकी ठरवला नाही. रिषभ पंतच्या ७७ धावांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने मुंबईला २१४ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान घेऊन फलंदाजीकरिता उतरलेल्या मुंबईला एकामागोमाग एक झटके बसत गेले. दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत सुरूवातील मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा १४ धावांवर बाद केले. दिल्लीच्या ईशांत शर्माने ही विकेट घेतली. त्यानंतर सुर्यकुमार यादवही लगेचच धावबाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉकने फलंदाजीची जबाबदारी घेतली. एक षटकार आणि चार चौकार मारत चांगली फलंदाजी करत असताना, ईशांत शर्माने डी कॉकलाही माघारी पाठवले. पोलार्डलाही विशेष चांगली फलंदाजी करता आली नाही, तर हार्दिक पांड्यानं आपले खातेही उघडले नाही.
या दोघांनंतर कृणाल पांड्यांने १५ बॉलमध्ये ३२ धावा करत मुंबईला सावरण्याचा प्रयत्न केला पण मोठे शॉट खेळण्याच्या नादात कृणालनं विकेट टाकली. या सामन्याचा सामनावीर ठरला तो रिषभ पंत. रिषभनं आपल्या २७ चेंडूत ७७ धावा करत मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढली.केवळ 18 बॉलमध्ये पंतनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. सहा चौकार आणि चार षटकार ठोकत २७३च्या स्ट्राईकनं पंतने फलंदाजी केली. मुंबईच्या चमूमध्ये याच हंगामात सहभागी झालेल्या युवराज सिंगने एकाकी झुंज देत मुंबईला तारण्याचा प्रयत्न केला पण इतर फलंदाजांची त्याला योग्य साथ न मिळाल्याने मुंबईने हा सामना गमावला. युवराजनं ३३ चेंडूत आपले अर्धशतक पुर्ण केले. मात्र, ५३ धावांवर युवराज बाद झाला.
प्रथम गोलंदाजी करताना मुंबईच्या संघाने शेवटच्या २० चेंडूत तब्बल ९० धावा दिल्या. या सामन्यात अपेक्षेप्रमाणे मुंबईचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची गोलंदाजी आक्रमक ठरली नाही. हार्दिक पांड्यांने आपल्या चार ओव्हरमध्ये ४१ धावा देत कॉलिन इनग्राम या फलंदाजाला बाद केले. मात्र मुंबईला लसिथ मलिंगाची कमतरता जाणवली असणार. मुंबईचा पुढचा सामना शुक्रवारी बंगळुरू विरोधात चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे.