राज्यसभा आणि कॅबिनेट मंत्रीपदाच्या आश्वासनामुळे तिकीटाचा आग्रह सोडला : रामदास आठवले

आपण दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार होतो परंतु उमेदवारीचा वाद आता मिटलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे आपण माघार घेतल्याची माहिती रामदास आठवले यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
याबाबत बोलताना, रामदास आठवले म्हणाले की, दक्षिण मध्य मुंबईतून मी याआधी निवडून आलो होतो. त्यामुळे इथे मला संधी मिळावी अशी इच्छा होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर माझे व मित्र पक्षांचे याबाबत बोलणेदेखील झाले होते. त्यामुळे मला जागा मिळायला हवी होती. परंतु काल (शनिवारी)माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले, तेव्हा त्यांनी मला राज्यसभेचे आश्वासन दिले आहे. तसेच मी कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा मुख्यमंत्र्यासमोर ठेवली आहे.
रामदास आठवले यांनी माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांना उमेदारी देण्यात आली आहे. राहुल शेवाळेंच्या उमेदवारीला आठवले यांनी पाठिंबा दिला आहे. आठवले याबाबत म्हणाले की, राहुल शेवाळे माझे चांगले मित्र आहेत. मी आणि माझे कार्यकर्ते शेवाळेंच्या प्रचारात सहभागी होणार आहोत. आम्ही त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणू.