Loksabha 2019 : राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याचा विषयसुद्धा जाहिरनाम्यात…

तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष डीएमकेनं मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. मतदारांना आकर्षित करण्यासाठी डीएमकेनं आश्वासनांची खैरात केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचेही आश्वासन डीएमकेनं जाहीरनाम्यात दिलं आहे. याशिवाय मोदी सरकारच्या नोटाबंदीमुळे ‘पीडित’ झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देणार असल्याचंही त्यात म्हटलं आहे.
चेन्नईत झालेल्या कार्यक्रमात डीएमकेच्या वतीनं लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात राजीव गांधींच्या हत्या प्रकरणातील आरोपींची तुरुंगातून सुटका करण्यात येईल, असं आश्वासन पक्षानं दिलं. याआधीही डीएमकेनं राज्य सरकार आणि राज्यपालांकडे या प्रकरणातील दोषींच्या सुटकेची अनेकदा मागणी केली आहे. यानंतर राज्यात राजकीय वाद सुरू झाला आहे.
२१ मे १९९१ रोजी श्रीपेरंबदूर येथे राजीव गांधी यांची हत्या झाली होती. या प्रकरणी दोषी पेरारिवेलन, मुरुगन, नलिनी, शांतन, रविचंद्रन, जयकुमार आणि रॉबर्ट प्यास हे जवळपास तीन दशकांपासून तुरुंगात आहेत. सप्टेंबर २०१८मध्ये तामिळनाडू सरकारनं एक प्रस्ताव मंजूर करून राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार, या प्रकरणात तुरुंगात कैद असलेल्या दोषींची सुटका करण्याची परवानगी मागितली होती.
पद्दुचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा, श्रीलंकेतून आश्रयाला आलेल्यांना नागरिकत्व, मनरेगा योजनेंतर्गत १५० दिवस रोजगार देण्याची हमी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज माफ, ‘नीट’मधून सूट आदी आश्वासनंही डीएमकेनं दिली आहेत.