लोकसभा २०१९ : अर्जुन खोतकर आपल्या भूमिकेवर ठाम ! मातोश्रीवरील बैठकीचा परिणाम नाहीच…

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली आहे. मात्र जालनामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना आमदार अर्जून खोतकर यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे, महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्यात प्राथमिक बैठक पार पडली मात्र या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही.
जालन्यातील जागेवर आजच्या बैठकीत अंतिम तोडगा निघेल असे वाटत होते परंतु कुठल्याही ठोस चर्चेविनाच ही बैठक पार पडली. मराठवाड्यातील युतीच्या समन्वयकाची जबाबदारी पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. परंतु समन्वयकाच्या भूमिकेमुळेच मोठा वाद निर्माण झाला असून आजची चर्चा पुन्हा उद्यावर गेली आहे.
शिवसेना भाजप युतीचा दुसरा मेळावा औरंगाबादमध्ये उद्या आयोजित करण्यात आला आहे. त्याआधी रामा हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात होणार बैठक आहे. या बैठकीत जालनाच्या वादावर पडदा पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
काय म्हणाले अर्जुन खोतकर ?
मी आजच्या बैठकीत उद्धव ठाकरेंसमोर प्रस्ताव ठेवले आहेत. जालन्यात एक तर मैत्रीपूर्ण लढत व्हावी किंवा जालना शिवसेनेला सुटावी. जालन्याची जागा शिवसेना निश्चित जिंकून येईल, हा विश्वास मला आहे आणि हे मी उद्धव ठाकरेंना पटवून दिले आहे. पंकजा मुंडे समन्वयक म्हणून आज बैठकीला आल्या होत्या. काँग्रेसमध्ये जाण्याबाबत अजून निर्णय नाही. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली आहे.