खा.दानवे यांच्या विरुद्ध शड्डू ठोकणा-या अर्जुन खोतकरांच्या गळ्यात युती समन्वयकपदाची माळ !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी शड्डू ठोकून दानवेंच्या नाकात दम आणलेल्या आ. अर्जुन खोतकर यांना आवरण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या गळ्यात थेट मराठवाडा युती समन्वयकपदाची माळ घातल्यामुळे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
आता हे पद खोतकर स्वीकारतात कि, पक्ष नेतृत्वासमोर आव्हान निर्माण करतात हे पहावे लागणार आहे. त्यामुळे प्रथम दर्शनी तरी जालनालोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे असेच म्हणावे लागेल. परीणामी जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच लढणार आहेत.तर ईशान्य मुंबईची जागाही भाजपच लढवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
जालन्याची जागा रावसाहेब दानवेच लढवणार असल्याने आता अर्जुन खोतकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे तर शिवसेनेचा विरोध पाहता ईशान्य मुंबईत कोण उमेदवार द्यायचा हा सुद्धा प्रश्न भाजपसमोर आहे.
किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याने ईशान्य मुंबईची जागा कोण लढणार ? हा प्रश्न सध्या दोन्ही पक्षांसमोर आहे.
गेल्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकर यांनी बंड करत जालनाच्या जागेवर दावा केला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर दोघांचा शब्द अंतिम राहिल असं वक्तव्य खोतकरांनी सांगितलं होतं. मात्र आता दानवेंना उमेदवारी मिळणार असल्याने अर्जुन खोतकर यांची वैयक्तिक भूमिका काय असेल ? यांची उत्सुकता आहेच !
जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी युतीमधला नेत्यांनी चांगलीच शक्कल लढवताना मराठवाड्यातील युतीच्या समन्वयकपदी
शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांची नेमणूक केली आहे. नव्या जबाबदरीमुळे अर्जुन खोतकर यांची गोची होण्याची शक्यता आहे. तर पक्ष श्रेष्ठींकडून सुंठीवाचून खोकला घालवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दुसरीकडे अर्जुन खोतकर समर्थकांनी रावसाहेब दानवेंविरोधात निवडणूक लढवण्यासाठी खोतकर यांच्याघरासमोर आंदोलन करत दबाव वाढवलाआहे.