Loksabha 2019 : मोदींच्या गावात काॅंग्रेसची डरकाळी, सोनिया-मनमोहनसिंह यांची मोदींवर टीका

लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं असून, सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. मोदी स्वतः पीडित असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळं देशाची जनता पीडित झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.
अहमदाबादमधील सरदार पटेल राष्ट्रीय स्मारक येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात सोनियांनी मोदींवर निशाणा साधला. राष्ट्रहितासंबंधी मुद्द्यांवर मोदी सरकार राजकारण करत आहे, असा आरोप त्यांनी केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही मोदी सरकारवर तोफ डागली. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं अर्थव्यवस्था कोसळली. सध्याच्या घडीला देशातील जनतेला यूपीए सरकारच्या काळातील यशस्वी योजनांबाबत सांगणं गरजेचं झालं आहे. सध्याचं केंद्रातील भाजप सरकार खोटा प्रचार करत आहे, असं ते म्हणाले.
तत्पूर्वी, पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली. तसंच साबरमती आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना काँग्रेसच्या नेत्यांनी आदरांजली वाहिली. तब्बल ५८ वर्षांनी गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. याआधी १९६१ मध्ये भावनगरमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती.