रमजानच्या काळात कोणत्याच सणाच्या दिवशी किंवा शुक्रवारी मतदान नाही : निवडणूक आयोग

रमजानच्या काळात कोणत्याच सणाच्या दिवशी किंवा शुक्रवारी मतदान होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे . रमजानच्या पूर्ण महिन्यात निवडणूक रद्द करणे शक्य नाही, असंही आयोगानं स्पष्टपणे सांगितलं आहे. विद्यमान सरकारची मुदत ३ जून रोजी संपत असल्याने २ जूनपूर्वी नवे सरकार स्थापन करणं आवश्यक आहे. एका महिन्यात निवडणुका होणे शक्य नव्हते . त्यामुळे कोणत्याच शुक्रवारी किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी मतदान होणार नाही ही बाब लक्षात घेण्यात आली. या तारखा बदलणे किंवा निवडणुकीचा काळ पुढे ढकलण्याचा पर्याय आमच्यासमोर नव्हता, असे निवडणूक आयोगाने सांगितले .
काही मुस्लीम नेते आणि मौलवींनी रमजान महिन्यातील निवडणुकांबद्दल आक्षेप नोंदवला आहे इतकेच नव्हे तर त्यांनी मतदानाच्या तारखा बदलण्याची मागणीही केली आहे. कोलकात्याचे महापौर आणि तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हाकिम यांनीही तारखांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. निवडणूक आयोग एक संवैधानिक संस्था आहे. तिचा आम्ही सन्मान करतो. निवडणूक आयोगाविरोधात काही बोलायचे नाही, पण सात टप्प्यांत होणाऱ्या निवडणुका बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या नागरिकांसाठी त्रासदायक आहेत. सर्वात जास्त अडचणी मुस्लिमांसमोर असणार आहेत. कारण मतदानाच्या तारखा रमजानच्या महिन्यातील आहेत, असं ते म्हणाले होते. आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनीही निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला विरोध दर्शवला होता.
राजकारण करू नये : असदुद्दीन ओवेसी
रमजान महिन्यात मतदान घेण्यास काही मुस्लिम नेते आणि मौलानांनी आक्षेप नोंदवलेला असतानाच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र या मुद्द्यावर राजकारण करू नये, असं आवाहन केलंय. रमजानमध्ये मतदान घेण्यास विरोध हा निव्वळ राजकीय वाद आहे. रमजानच्या महिन्यात निवडणुका घेणं अधिक चांगलं असून या महिन्यात मुस्लिम समाज सर्वाधिक मतदान करेल, असा दावा ओवेसी यांनी केला आहे. रमजानमध्ये मतदान होणं अधिक चांगलं आहे. त्याकाळात आम्हाला दुपारचं जेवणं बनविण्याची गरज पडत नाही. घरात आम्ही सगळे निवांत असतो. त्यामुळे सर्वजण घरातून बाहेर पडून भरभरून मतदान करतील. वाईट कृत्यांचा नायनाट करणारा हा महिना आहे. त्यामुळे जे शासनकर्ते वाईट आहेत, त्यांच्याविरोधात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर मतदान करेल, असा दावाही त्यांनी केला.