शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौ-यावर आले असून, त्यांच्या हस्ते विदर्भातील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे जनसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना रोखठोक इशारा दिला आहे. ”पुलवामा येथील झालेल्या घटनेनंतरचा जनतेतील असंतोष मी समजू शकतो. या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानही शहीद झाले आहेत. मी पुन्हा सांगतो, शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. दहशतवादी संघटनांची जो गुन्हा केला आहे तो विचारात घेता त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. तुम्ही धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा, पुलवामाच्या गुन्हेगारांना शिक्षा, कशी, कुठे दिली जाईल ते आमचे जवान ठरवतील, असा इशाराच मोदी यांनी दिला.
“मोदी गो बॅक”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी यवतमाळमधील पांढरकवडा येथे “मोदी गो बॅक” अशी फलके झळकत आहेत. काँग्रेसने ही फलके लावल्याचे सांगितले जात आहे. 2014 मध्ये मोदी याच मतदार संघातील दाभडी गावात आले होते, तेथून त्यांनी “चाय पे चर्चा” कार्यक्रमातून देशातील शेतकऱ्यांना आश्वासने दिली होती, मात्र ती पाळली नाही, त्या निषेधार्थ हे फलक लावले गेले.