विदेशयात्रेनंतर आता मोदी-शहा यांच्या तीर्थयात्रा …

भाजपचा रथयात्रांवर अधिक भर !!
३३ जिल्ह्यांमध्ये फिरणार १२ ज्योतिर्लिंग रथ !!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह सोमनाथ मंदिरात १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिनिधींची भेट घेण्याची शक्यता आहे. २३ आणि २५ फेब्रुवारी दरम्यान नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही भेट घेऊ शकतात. नरेंद्र मोदी आणि अमित शाह विश्वस्त असणाऱ्या सोमनाथ विश्वस्त मंडळाने १२ ज्योतिर्लिंग रथ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमनाथ मंदिरात हे सर्व रथ एकत्र येतील आणि शोभा यात्रेला सुरुवात होईल. सोमनाथ मंदिरातून सर्व रथ वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरण्यासाठी रवाना होतील. हे सर्व रथ १७ ते २१ फेब्रुवारी दरम्यान ३३ जिल्ह्यांमध्ये फिरणार आहेत. प्रत्येक रथ किमान तीन जिल्ह्यांमध्ये फिरणार आहेत.
१२ ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधी एकत्र येण्याची ही दुसरी वेळ आहे. जानेवारी २०१८ मध्ये उज्जैन येथे सर्व प्रतिनिधी एकत्र आले होते. ‘विश्वस्तांच्या बैठकीत फेब्रुवारीच्या अखेर हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमांचं नेतृत्व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याकडे सोपवण्यात आलं असून त्यांच्याहस्तेच उद्धाटन करण्यात येणार आहे. विजय रुपाणी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रथ शोभा यात्रेसाठी रवाना होतील. अमित शाह यांनी २४ फेब्रुवारीला आपण कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचं सांगितलं आहे’, अशी माहिती गुजरातचे निवृत्त मुख्य सचिव आणि सोमनाथ मंदिरातील सात विश्वस्तांपैकी एक असणाऱ्या पी के लेहरी यांनी दिली आहे.
नरेंद्र मोदी कार्यक्रमाला हजर राहणार की नाही यासंबंधी विचारलं असता लेहरी यांनी सांगितलं की, ‘आम्ही पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहोत. तीन दिवसांसाठी त्यांचा कार्यक्रम ठरलेला आहे. ते कधी कार्यक्रमाला हजेरी लावू शकतात याची पाहणी केली जात आहे. जर ते आले तर आम्ही एक वेगळा कार्यक्रमही आयोजित करु शकतो’.कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्ही उज्जैनमधून मदत घेत आहोत अशी माहिती लेहरी यांनी दिली आहे. विश्व हिंदू परिषदेचे स्वयंसेवकही मदतीचा हात देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगांचं प्रतिनिधित्व करणारे रथ वेरावल येथील संस्कृत महाविद्यालयातून २२ फेब्रुवारीला रवाना होतील. भाजपासाठी सोमनाथ मंदिराचं विशेष महत्त्व आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० मध्ये सोमनाथ येथून अयोध्या रथ यात्रेला सुरुवात केली होती. यानंतर गुजरात आणि नंतर केंद्रात भाजपा सत्तेत आली होती.