राज्यसभेत काय झाले ? अखेरच्या दिवशी ?

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव आणि अंतरिम अर्थसंकल्प २०१९-२० संमत झाल्यानंतर काल बुधवारी राज्यसभेची कार्यवाही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्याचबरोबर बहुप्रतिक्षित तिहेरी तलाक विधेयक आणि नागरिकत्व विधेयक संमत करण्याची सरकारची इच्छा अपूर्णच राहिली. हे विधेयक सादर होऊ शकले नाही. तिहेरी तलाक विधेयकावरून राजकीय वाद सुरू आहे. काँग्रेसने सत्ता आली तर तिहेरी तलाक कायदा संपुष्टात आणले जाईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, राज्यसभेत वित्त विधेयक आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना पारित झाला.
राष्ट्रपती अभिभाषणावर चर्चेसाठी १० तास, अर्थसंकल्पावर ८ तास आणि २ विधेयकावर चर्चा करण्यासाठी २ तास निश्चित करण्यात आले होते. मात्र, अखेरच्या दिवशी २० मिनिटे विना चर्चा अभिभाषण आणि अंतरिम अर्थसंकल्प संमत करण्यात आला. १९९१ आणि १९९६ मध्ये राजकीय कारणांमुळे आभार प्रस्तावही संमत झाला नव्हता.
संसदेने बुधवारी मोदी सरकारचे सहावे आणि अंतिम अर्थसंकल्प मंजूर केले. यामध्ये ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकर सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पात छोट्या शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपयांची मदत आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे. तर लोकसभेत समायोजन संबंधीचे विधेयक (पुढील संपूर्ण अर्थसंकल्पापूर्वीच्या खर्च करण्याच्या अधिकाराशी निगडीत) आणि वित्त विधेयक पूर्ण चर्चेअंती पारित करण्यात आला. पण सत्राच्या अखेरच्या दिवशी बुधवारी राज्यसभेत हे कोणत्याही चर्चेविना पारित करावे लागले.