श्रीनगरच्या चकमकीत ठार झालेले ३ जन दहशतवादी नसल्याचा कुटुंबीयांचा दाव

जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरजवळ बुधवारी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन जण ठार झाले. मारले गेलेले तीनही जण दहशतवादी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर कुटुंबीयांनी हा दावा फेटळून हे ‘फेक एन्काऊन्टर’ असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी निष्पापांचा बळी घेऊन त्यांना दहशतवादी घोषित केल्याचे मारल्या गेलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
पोलीस आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे ही कारवाई केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस रेकॉर्डमधील दहशतवाद्यांच्या यादीत या तिघांच्या नावाचा उल्लेख नव्हता. परंतु, ते दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. दहशतवाद्यांसाठी काम करणाऱ्या स्थानिकांना जम्मू काश्मीर पोलिसांकडून ‘ओजीडब्ल्यू’ अर्थात ‘ओव्हर ग्राऊंड वर्कर्स’ असे संबोधले जाते. यांचे संबंध थेट दहशतवाद्यांशी असतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार करण्यात आलेल्यांपैंकी एक जण हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी रईस कचरू याच्याशी संबंधित आहे. रईस २०१७ मध्ये ठार झाला होता. तसेच, एन्काऊन्टरमध्ये ठार झालेल्या इतर दोन जणांची नावे एजाज मकबूल गनी, जुबैर लन आणि अतहर मुश्ताक अशी आहेत. तर दुसरीकडे, ठार झालेल्या तिघांमध्ये एक तरुण पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असून इयत्ता ११ वी शिकत असणारा विद्यार्थी होता, असाही दावा संबंधित कुटुंबाकडून करण्यात आला आहे. एजाज मकूबल याचे वडील गंदरबाल जिल्ह्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असल्याचे नातेवाईकांने सांगितले.
उल्लेखनीय म्हणजे, याच आठवड्यात शोपियाँ भागातील एका प्रकरणात तीन जणांना ठार करून त्यांना चुकीच्या पद्धतीने दहशतवादी घोषित करण्याच्या आरोपाखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आर्मीच्या कोर्ट एन्क्वायरीमध्येही हे लोक दोषी आढळले आहेत. एन्काऊन्टरनंतर जवानांच्या दाव्यानुसार, घटनास्थळी त्यांना हत्यारे सापडली होती. परंतु, चौकशीत मात्र या फेक एन्काऊन्टरमध्ये तीन मजुरांना ठार करण्यात आल्याचे आणि त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर हत्यारं ठेवण्यात आल्याचे उघड झाले.