MaharashtraPoliticalUpdate : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी महाविकास आघाडी सोडण्याच्या तयारीत

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे महाविकास आघाडीमध्ये असले तरी शब्द दिल्याप्रमाणे त्यांना महाविकास आघाडीत कुठलेही स्थान न दिल्यामुळे आघडीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राजू शेट्टी यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना तसे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीने आमची सर्व पातळ्यांवर निराशा केली आहे. त्यामुळे मविआ सरकारमधून बाहेर पडण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या ५ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत कठोर निर्णय घेतला जाईल, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
शेट्टी पुढे म्हणाले कि , विधानपरिषदेत स्वाभिमानीला एक जागा द्यायची असा शब्द दिला होता. हा शब्द पाळायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण आम्हाला काही फरक पडत नाही. ऑगस्ट महिन्यातच सांगितलं होतं मला आमदारकीशी देणं घेणं नाही. त्यावेळी जाणीवपूर्वक बातमी पेरली गेली की राजू शेट्टींचं नाव वगळलं. कार्यकारिणीचा निर्णय झाल्यानंतर माझा वैयक्तिक निर्णय काय होईल ते कळेल, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान येत्या ५ एप्रिल रोजी कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक होत असून त्यामध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यानंतर महाविकास आघाडीमध्येही संघटना सहभागी झाली. सरकारला दोन वर्षे झाली तरी संघटनेला निर्णय प्रक्रियेत कुठेच स्थान दिले जात नसल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह संघटनेचे सर्वच नेते नाराज आहेत. वीज पुरवठा, महापूर नुकसान भरपाई, पीक विमा, प्रोत्साहन अनुदान यासह काही मागण्या संघटनेने सरकारकडे केल्या. पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी वाढत आहे. त्यामुळेच राजू शेट्टी यांच्याकडून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले जात आहेत.