IndiaNewsUpdate : पीएम मोदींचा पंजाब दौरा : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना आदेश …
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरक्षेच्या कारणास्तव पंजाब दौरा अर्धवट सोडावा लागल्याच्या घटनेनंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. दरम्यान यावरून पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली. दरम्यान भाजप आणि काँग्रेसमध्येही यावरून चांगलीच जुंपलेली असताना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी सुरक्षेत कोणतीही चूक झाली नसल्याचा खुलासा केला असला तरी , काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्याशी संपर्क साधून या संपूर्ण घटनेस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत सोनिया गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे. यावेळी सोनिया गांधी यांनीमुख्यमंत्री चन्नी यांच्याशी बोलताना, पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात संपूर्ण काळजी घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया देऊन झालेल्या घटनेस जे कुणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असेही म्हटले आहे.
पंतप्रधानांचा ताफा एक किलोमीटर आधीच थांबवण्यात आला होता…
कालपासून या विषयावरून प्रचंड आरोप -प्रत्यारोप सुरु असताना आपला खुलासा करताना मुख्यमंत्री चन्नी म्हणाले, पंतप्रधानांच्या कार्यक्रमात शेवटच्या क्षणी अचानक बदल झाला. पंतप्रधानांना हेलिकॉप्टरने जायचे होते. मात्र त्यांनी अचानकच रस्त्याने जाण्याचे ठरवले. यात पोलिसांची चुकी नाही. तसेच, आंदोलक ज्या ठिकाणी रस्ता रोखून बसले होते, तेथपासून पंतप्रधानांचा ताफा एक किलोमीटर आधीच थांबवण्यात आला होता. मग यात धोका कसला? तसेच पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी, हे केंद्रीय संस्था इंटेलिजन्स ब्युरो आणि एसपीजीचे अपयश आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी आयबीच्या संचालकांनीही सुरक्षा व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. परंतु अचानक सकाळी १० ते १२ लोक जवळच्या गावातून आले आणि रस्त्यात बसले होते. याशिवाय पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी येणार होते, तो भाग मुळातच बीएसएफच्या अखत्यारीत येते, यामुळे यात राज्य पोलिसांची कसलीही चूक नाही.