Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : नवाब मलिक पुराव्यानिशी एनसीबीवर पुन्हा भिडले

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर तोफ डागली आहे . मुंबई – गोवा जाणाऱ्या  क्रूझवर एनसीबीने केलेल्या कारवाईवर ‘बनावट कारवाई’चा आरोप करून एनसीबीवर विविध आरोप केले होते .  दरम्यान आजही  त्यांनी जावई समीर खान याच्या अटकेसंदर्भात एनसीबीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १३ जानेवारी २०२१ रोजी समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात बोलताना नवाब मलिक म्हणाले कि , “माझा जावई समीर खानला २०० किलो ड्रग्ज सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो ड्रग्जचं रॅकेट चालवतो असे  सांगण्यात आले  होते . एनसीबीच्या कारवाईचे फोटो आणि प्रेस रिलीज समीर वानखेडे यांच्या नंबरवरूनच पाठवण्यात आले होते. मात्र, न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचे  उघड झालं आहे”, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. यावेळी नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्याच्या नंबरवरून व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आलेली प्रेस रिलीज आणि कारवाईचे फोटो देखील दाखवले. तसेच, संबंधि अधिकाऱ्याचा फोन नंबर देखील दाखवला.

“एनसीबीला तंबाखू आणि गांजामधला फरक कळू नये?”

“न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे कि ,  २०० किलो गांजा मिळालेला नाही. फक्त शाहिस्ता फर्निचरवालाकडे ७.५ ग्राम गांजा मिळाला. बाकी सगळं हर्बल टोबॅको आहे असे  अहवालात आले आहे.  आता प्रश्न हा उपस्थित होतो की एवढ्या मोठ्या एनसीबीसारख्या एजन्सीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्यकारक आहे. या एजन्सींकडे इन्स्टंट टेस्टिंगचं किट असतं. ज्यातून अंमली पदार्थ आहे किंवा नाही हे लगेच समजते . याचा अर्थ त्यांनी या सर्व गोष्टी तपासल्या, गांजा नव्हता. पण तरी लोकांना अडकवण्यात आले . २७ अ चे  कलम लागूच होत नाही. शाहिस्ता फर्निचरवालावर खटला दाखल होतो. पण तिला त्याच दिवशी जामीन देण्यात आला. रिया चक्रवर्ती प्रकरणात देखील करण सजनानीला गुंतवले. राहिला फर्निचरवाला या आरोपीला देखील गुंतवले . रिया चक्रवर्ती प्रकरणातल्या एका आरोपीला या प्रकरणात टाकले ”, असा दावा नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.

नवाब मलिक यांनी सांगितला घटनाक्रम

“८ जानेवारी २०२१ रोजी एनसीबीनं पत्रकारांना सांगितले  की दोन पार्सल युनिव्हर्सल कार्गोमधून जप्त करण्यात आले. जे करण सजनानीनं विजय शर्मा नावाच्या एका व्यक्तीकडे शिलाँगला पाठवायला बुक केले  होते . ९ जानेवारीला वांद्र्यात करण सजनानीच्या घरी छापा टाकला आणि एनसीबीनं प्रेस रिलीज काढून २०० किलो गांजा जप्त केल्याची माहिती दिली. त्याच दिवशी एनसीबीच्या एका अधिकाऱ्याच्या नंबरवरून प्रेस रिलीज आणि ४ फोटो पाठवले गेले. याच नंबरवरून सगळ्यांना मेसेजेस पाठवले गेले. ९ जानेवारीला शाहिस्ता फर्निचरवाला नावाच्या मुलीकडे ७.५ ग्रॅम गांजा सापडला. तिला त्याच दिवशी जामीन दिला गेला. नवी दिल्लीत प्रिन्स पान, हाऊस ऑफ पान, रॉइस पान नोएडा, सांजा पान गुडगाव, नितीन बँगलोर, मुच्छड पानवाला याच्याकडे छापा टाकला गेला”, असेही  मलिक म्हणाले.

पण शेवटी जामीन मिळाला…

“१२ तारखेला रात्री समीर खान यांना एनसीबीचे  समन्स मिळाले  आणि १३ तारखेला १० वाजता बोलावण्यात आले . समीर खान एनसीबी कार्यालयात पोहोचले. संध्याकाळपर्यंत माहिती आली की २७ अ कलमांतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. जेल कस्टडीनंतर आमची जामीन याचिका रद्द झाली. ६ महिने पूर्ण झाले तेव्हा सुनावणी झाली आणि एनसीबीने  तेव्हा चार्जशीट फाईल करतो असे  सांगितले . कनिष्ठ न्यायालयात आम्ही जामीन याचिका दाखल केली. साडेतीन महिने एनसीबीने  टाळाटाळ केली. पण शेवटी जामीन मिळाला”, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

एनसीबीचा हा सगळा बनाव उघड झाला

“२७ तारखेला एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात समीर खान आणि त्याच्यासोबतच्या दोन इतर आरोपींना साडेआठ महिने जेलमध्ये राहिल्यानंतर जामीन दिला गेला. काल सकाळी ११ वाजता कोर्टाच्या ऑनलाईन पोर्टलवर तो आदेश अपलोड झाला. माझ्या जावयाला साडेआठ महिने जेलमध्ये राहावे  लागले . माझी मुलगी मानसिक धक्क्यामध्ये होती. त्यांच्या दोन लहान मुलांवर परिणाम झाला”, असेही  नवाब मलिक यावेळी म्हणाले. दरम्यान सर्व चॅनल्सवर मोठ्या प्रमाणावर गांजा मिळाल्याचं दाखवले  जात होते . पण घराच्या तपासणीत असे  काहीही सापडले  नाही. पण माध्यमांना तसे  सांगितले  गेले .  लोकांना बदनाम करण्याचे  काम एनसीबी करत आहे. एनसीबी बनाव करते. या प्रकरणात एनसीबीचा हा सगळा बनाव उघड झाला आहे”, असे  नवाब मलिक म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!