IndiaNewsUpdate : रजनीकांत यांनी पक्षस्थापनेबद्दल घेतला मोठा निर्णय

प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत नव्या वर्षात नवीन राजकीय पक्ष सुरु करणार अशा चर्चा रंगलेल्या असतानाच त्यांनी आपला मोठा निर्णय जाहीर केला आहे. चाहत्यांच्या माहितीसाठी जाहीर केलेल्या आपल्या लेखी निवेदनात प्रकृतीच्या कारणास्तव नवीन राजकीय पक्ष सुरु करण्याचा विचार मागे घेतला आहे. याबाबत त्यांनी तीन पानांचं पत्र ट्विट करत ही घोषणा केली आहे. घोषणा केल्याप्रमाणे आपण पक्ष स्थापन करत नसल्याबद्दल त्यांनी आपल्या चाहत्यांची माफीही मागितली आहे.
— Rajinikanth (@rajinikanth) December 29, 2020
या पत्रात रजनीकांत यांनी आपण राजकीय पक्ष सुरु करणार नसून आपली बिघडलेली प्रकृती हा देवाने दिलेला इशारा होता असं म्हटलं आहे. रजनीकांत यांनी यावेळी आपल्यावर विश्वास ठेवलेल्यांना आपण बळीचा बकरा झालो असं वाटू नये असं सांगताना बिघडलेली प्रकृती हा एक इशारा असल्याचा उल्लेख केला आहे. रजनीकांत यांनी म्हटलं आहे की, “गेल्या काही दिवसांत माझ्या प्रकृतीसंबंधी ज्या काही घडोमाडी झाल्या त्या मी देवाचा इशारा समजतो आणि २०२१ तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याचा विचार रद्द करत आहे”.
दरम्यान रजनीकांत यांना त्यांची प्रकृती बिघडल्याने हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना रक्तदाब आणि थकव्याचा त्रास जाणवत होता. २७ डिसेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डॉक्टरांनी त्यांना एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. रजनीकांत यांनी डिेसेंबर २०१७ मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर ही घोषणा करण्यात आली होती. मात्र लोकसभा नि़वडणुकीत रजनीकांत यांनी सहभाग घेतला नव्हता. पण आता होणारी विधानसभा निवडणूक ते लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र आता त्यावरही पडदा पडला आहे.