CoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू
गेल्या २४ तासात आज दिवसभरात २१ हजार २९ नवीन रुग्ण आढळले असून १९ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दिवसभरात ४७९ मृत्यूंची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा ३३ हजार ८८६ इतका झाला आहे. याशिवाय ४०६ रुग्णांचा अन्य कारणांनी मृत्यू झाला आहे. गेले काही दिवस करोनामुक्त रुग्ण आणि नवीन रुग्ण यांच्यातील तफावत वाढत चालली असताना हे प्रमाण आज पुन्हा उलट झाले आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा टक्काही कमी झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १९ हजार ४७६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ९ लाख ५६ हजार ३० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील करोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आज ७५.६५ टक्के इतके झाले आहे.
राज्यात आज २१ हजार २९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत एकूण ६१ लाख ६ हजार ७८७ जणांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १२ लाख ६३ हजार ७९९ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण चाचण्यांपैकी २०.६९ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यात सध्या १८ लाख ७५ हजार ४२४ व्यक्ती होम क्वारंटाइन असून ३४ हजार ४५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कोरोना मृत्यूदर ही आजही राज्यासाठी सर्वाधिक चिंतेची बाब आहे. राज्यात आज आणखी ४७९ मृत्यूंची नोंद झाली असून राज्यातील मृत्यूदर सध्या २.६८ टक्के इतका आहे. ४७९ मृतांपैकी १२७ मृत्यू मागल ४८ तासांतील आहेत, १२७ मृत्यू मागील आठवड्यातील आहेत तर उर्वरित १०१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत, असे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. राज्यातील करोना मृत्यूंचा एकूण आकडा आज ३३ हजार ८८६ वर पोहचला आहे. राज्यात सध्या प्रत्यक्षात २ लाख ७३ हजार ४७७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर या भागांत सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात ५९ हजार ३३२, ठाणे जिल्ह्यात २९ हजार ४७७, मुंबई शहर आणि उपनगरात २७ हजार १८६ तर नागपूर जिल्ह्यात सध्या १९ हजार २४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.