CoronaMumbaiUpdate : या शहरात 1 तारखेपासून 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊन

मुंबई महापालिकेने धारावीसारख्या झोपडपट्टी भागात रुग्णवाढ नियंत्रित केलेली असली, तरी मुंबईबाहेरच्या उपनगरांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई आणि ठाण्यात टाळेबंदीचे नियम कडक करणार अशी घोषणा झाली. पण प्रत्यक्षात मीरा भाईंदरपासून या कडक टाळेबंदीला सुरुवात होणार आहे.
मीरा भाईंदरमध्ये 1 तारखेपासून 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात फक्त दूध आणि औषधांची दुकानं उघडी राहतील. बाकी दुकानं बंदच राहतील. केवळ जीवनावश्यक गोष्टींच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली आहे. औषधांची दुकानंसुद्धा फक्त 9 ते 5 याच वेळेत उघडी राहतील, असं महापालिकेतर्फे कळवण्यात आलं आहे.
29 जूनपर्यंत मीरा भाईंदरमध्ये 9000 नागरिकांची COVID चाचणी करण्यात आली. त्यात 3000 हून अधिक नागरिक पॉझिटिव्ह आढळले. 142 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मीरा रोड भागात सर्वाधिक रुग्ण आहेत. महापालिका क्षेत्रातले निम्म्याहून अधिक रुग्ण याच भागात आहेत. त्यामुळे इथे टाळेबंदीची सर्वांत कठोर अंमलबजावणी असेल.
दरम्यान नाशिक शहरातील वाढती कोरोनाबाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यापुढे सायंकाळी 7 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू अधिक कडक करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजेनंतर विनाकारण घराबाहेर पडणार्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता या ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात 4 हजारहून अधिक रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात 103 रूग्णांची प्रकृती गंभीर आहे.जिल्हयात आतापर्यंत कोरोना आजाराने 236 जणांचा मृत्यू झाला यात 99 मृत्यू नाशिक शहरात झाले.