भाजपा पसरवत आहेत जातीय द्वेषाचा व्हायरस, सोनिया गांधी यांचा प्रहार

करोना व्हायरसचा होणार फैलाव आणि त्याचा वेग गेल्या तीन आठवड्यांपासून चिंता वाढवणारा असल्याचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारला देण्यात आलेल्या सल्ल्यांवर पक्षपाती आणि अत्यंत वाईट पद्धतीने पाऊले उचलली जात आहे असे ही त्यांनी म्हटले आहे. करोनाचा फैलाव कमी करत नियंत्रण मिळवण्यामध्ये सरकार अयशस्वी झाल्याची टीका यावेळी सोनिया गाधी यांनी केली.
करोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर सोनिया गांधी यांची आज पक्षातील काही प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली. करोनाचे संकट निर्माण झाल्यापासून सोनिया गांधी यांनी पहिल्यांदाच भाजपावर जाहीर टीका केली आहे. “मला तुमच्यासोबत असे काही शेअर करायचे आहे, ज्याची प्रत्येत भारतीयाने चिंता करण्याची गरज आहे. जेव्हा सर्वांनी एकत्रितपणे करोनाशी लढा देणे अपेक्षित असताना, भाजपा मात्र जातीय पूर्वग्रह आणि द्वेष पसरवत आहेत. आपल्या सामाजिक सुसंवादाला मोठे नुकसना पोहोचवले जात आहे. प्रत्येक भारतीयाने याबाबत चिंता करण्याची गरज आहे. तसेच आपल्या पक्षाला हे नुकसान भरुन काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागणर आहे,” असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
आपण अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून करोनाशी एकत्रित लढा देण्याची ऑफर दिली. तसेच शहरी आणि ग्रामीण भागात झालेले नुकसान कमी करण्यासाठी काही सल्लेही दिले होते. अशी माहिती सोनिया गांधी यांनी दिली. “पण दुर्दैवाने त्यांनी फक्त पक्षपातीपणे वाईट पद्दतीने निर्णय घेतले. केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेली करुणा, मोठेपणा कुठेही दिसत नाही,” अशी टीका सोनिया गांधींनी केली आहे.
लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अशा परिस्थितीत मजूर वर्गाचे तसेच हातावर पोट असलेल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सोनिया गांधी यांनी गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने त्वरित ७ हजार ५०० रूपये देण्याची मागणी केली आहे. “ अनेक वैद्यकीय कर्मचारी कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय काम करत आहेत. आपण या सर्व करोना वॉरिअर्सना सलाम केला पाहिजे,” असंही त्या म्हणाल्या.
“लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात १२ कोटी लोकांनी रोजगार गमावले आहेत. आर्थिक कामे रखडली असताना बेरोजगारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला किमान ७ हजार ५०० रूपयांची आर्थिक मदत देणे आववश्यक आहे,” असं सोनिया गांधी म्हणाल्या. यावेळी त्यांनी टेस्टिंग किट्सवरही निशाणा साधला. पीपीई किट्सची कमतरता आणि त्यांच्या गुणवत्तेबाबत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सध्या करोनाच्या होणाऱ्या चाचण्यांची संख्या खुप कमी आहे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे,” असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही आरोप केले. “करोनाशी लढताना चाचण्या करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीतही चाचण्या कमी होत आहेत. तसेच पीपीई किट्सची गुणवत्ताही योग्य नाही. आम्ही अनेक सूचना केल्या. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही,” असेही सोनिया गांधी यांनी सांगितले.