Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पालघर सामूहिक हत्या प्रकरण : हि घटना दोन धर्मांमधला संघर्ष नाही, आग लावण्याचं काम करू नका, हल्लेखोरांना कठोर शिक्षा होईल : मुख्यमंत्री

Spread the love

राज्यात चर्चेची होत असलेली पालघर येथील मॉब लिंचिंगची घटना ही दोन धर्मांमधला संघर्ष नाही. यात कोणतीही धर्मांधता नाही. अफवा आणि गैरसमजूतीतून हे प्रकरण घडलं आहे. त्यामुळे याला धार्मिक रंग देऊन आग लावण्याचं काम करू नका. या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचाही प्रयत्न करू नका, अशा शब्दांत सोशल मीडियावरून विद्वेषी मेसेज पसरविणाऱ्यांना फटकारतानाच पालघर घटनेतील १०० हून अधिक हल्लेखोरांना त्याच दिवशी अटक केली असून कुणालाही सोडलं जाणार नाही. या हल्लेखोरांना कठोर शिक्षा केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

गुरुवारी पालघर येथे मध्यरात्री दोन साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात राजकारण सुरू झालं असून सोशल मीडियावरून विद्वेष पसरवणारे मेसेजही फिरवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा फेसबुकवरून जनतेशी लाइव्ह संवाद साधत पालघर घटनेवरून राजकारण करणाऱ्यांना फटकारतानाच सोसश मीडियावरून चुकीचे मेसेज व्हायरल करणाऱ्यांना इशारा दिला आहे. पालघर येथे मॉब लिंचिंगची घटना घडल्याचं उघडकीस होताच पोलिसांनी घटनास्थळी जावून आरोपींना तात्काळ ताब्यात घेतलं. पोलिसांनी एकूण १०० हून अधिक जणांना अटक केली असून त्यात पाच मुख्य आरोपी आणि ९ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. इतर आरोपी दादरा नगर हवेली आणि महाराष्ट्रातील काही भागात लपल्याची शक्यता असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे.

सोशल मीडियावरील अफवांचा हा परिणाम 

या आरोपींना शोधल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. पालघरपासून ११० किलोमीटर अंतरावर असलेल्या गडचिंचोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून अफवा पसरल्या होत्या. त्याच गैरसमजूतीतून या तिघांची हत्या करण्यात आली आहे. यात कोणत्याही जातीपातीचा आणि धर्माचा संबंध नाही. या घटनेमागे कोणतंही धार्मिक कारण नाही. धर्मांधताही नाही. हिंदू-मुस्लिम वादही नाही. त्यामुळे कुणीही धर्माधर्मात आगी लावण्याचं काम करू नये. कुणीही या प्रकरणात तेल ओतण्याचं काम करू नये, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं. पालघर घटनेप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच हे प्रकरण सीआयडी क्राइमकडे सोपविण्यात आले असून सीआयडीचे अधिकारी अतूल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात तपास करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या प्रकरणातील ९ अल्पवयीन मुलांना सुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. तर सर्व आरोपींना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. देशात आणि राज्यात गेल्या पाच वर्षात मॉब लिंचिंगच्या अनेक घटना घडल्या. अगदी धुळ्यातही अशा घटना घडल्या. त्याची कारणंही वेगवेगळी होती. मात्र मला त्या राजकारणात पडायचं नाही, असं सूचक विधान करत राज्यात मॉब लिंचिंगच्या घटना खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , योगी आदित्यनाथ यांच्यासही चर्चा…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी पालघर प्रकरणी माझं बोलणं झालं असल्याचं सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि , त्यांना या घटनेची माहिती दिली आहे. ते देशाचे गृहमंत्री असल्याने कोणत्या ठिकाणी कोण राहतं हे त्यांना चांगलं माहीत आहे. त्यामुळे त्यांनीही पालघरची घटना दोन धर्मांमधील वाद असल्याचं वाटत नसल्याचं सांगितलं. तरीही त्यांनी असे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घ्यायला सांगितलं आहे. मीही त्यांना अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच सोशल मीडियावरून काही लोक या घटनेवरून आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. त्यांचा शोध घेण्याची विनंती शहा यांना केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही काल बोलणं झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

नेमकी घटना कुठे घडली ?

घटनेविषयी बोलताना ठाकरे म्हणाले कि , मॉब लिंचिंगची घटना पालघरमध्ये घडलेली नाही. ही घटना पालघरपासून ११० किलोमीटरवर गडचिंचोली गावात घडली. दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेवर ही घटना घडली आहे. तिथून गुजरात आणि दादरा नगर हवेली अवघ्या काही मीटरवर आहे. हा अत्यंत दुर्गम भाग आहे. जंगल परिसर आहे. या ठिकाणी जायला धड रस्ताही नाही. इतक्या वर्षात आपण रस्ताही देऊ शकलो नाही. ही दुर्देवी बाब आहे. रस्ता नसल्याने महाराष्ट्रातील पोलिसांनाही दादरा नगर हवेलीतून वळसा घालून गडचिंचोलीला जावे लागते. लॉकडाऊन संपल्यानंतर एकदा तुम्ही या गावाला भेट देऊन या म्हणजे हा भाग किती दुर्गम आहे हे तुम्हाला समजून येईल, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान हे साधू दादरा नगर हवेलीत गेले होते. पण त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. त्यांना तिथे प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे परतत असताना हा प्रकार घडला. केवळ गैरसमजुतीतून आणि अफवांमुळे हा प्रकार घडला असून ही अत्यंत लांच्छनास्पद घटना आहे, असं सांगून ते म्हणाले कि ,  या गावातील लोकांनी माणूसकी धर्म पाळायला हवा होता. त्यांना रात्रभर ठेवून सकाळी महाराष्ट्र पोलिसांच्या हवाली करायला हवं होतं. असं केलं असतं तर हा प्रकार घडला नसता, असं सांगतानाच या घटनेनंतर आम्ही गप्प बसलेलो नाही. आम्ही कठोर कारवाई केली आहे. कुणालाही माफ करणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!