Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Update : अभिव्यक्ती : महाप्रहार : पत्रकार राहुल कुलकर्णीला कसली अटक करताय…? हिम्मत असेल तर रेल्वे मंत्र्यांना अटक करा…

Spread the love

राहुल कुलकर्णीला अटक म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर…

मुंबईत बांद्र्यात झालेल्या गर्दीला राहुल कुलकर्णी नव्हे तर रेल्वेमंत्री आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. पण अनेक जण  या वस्तुस्थितीला समजून घेण्यास तयार नाहीत. राहुल कुलकर्णी हे एबीपी माझाचे उस्मानाबादचे पत्रकार असले तरी त्यांचे सोर्स नेहमीच पक्के असतात. खासकरून एबीपी माझाकडे भाजपच्या गोटातील सोर्स विश्वसनीय असतात त्याची कारणे जी काय असतील ती असतील पण हे खरे आहे. पण आता अडचण अशी झाली कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे सुरु करण्याच्या निर्णयाला झिडकारून लावले  आणि त्याचे खापर राहुल कुल्कर्णीवर फोडण्यात आले . आता मुद्दा असा आहे कि , राहुल कुलकर्णी यांच्या बातमीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले आणि तरीही असे म्हणणे कि , राहुल कुलकर्णी याच्या बातमीमुळे परप्रांतीय लोक बांद्रा रेल्वे स्थानकावर आले असे म्हणणे हास्यास्पद आहे.


यावर थोडे विस्ताराने बोलूयात , मुळात कोरोनाच्या जागतिक पार्श्वभूमीवर आधी कोणतेही गांभीर्य नसल्यामुळे जगाचे नेते व्हायला निघालेल्या नरेंद्र मोदी यांनी शेकडो फ्लाईटची व्यवस्था करून विदेशातील लाखो लोकांना सन्मानाने भारतात परत आणले. अमेरिकेसह इतर देशातील सरकारलाही हीच दर्पोक्ती भोवली आणि या विदेशी लोकांमुळे जगभरात चीनमधून निघालेल्या या व्हायरसने त्या त्या देशात शांततेने जीवन जगणाऱ्या लोकांना बाधित केले.

आपल्या देशाच्या बाबतीत बोलायचे झाले तर  जेंव्हा कोरोनाचे गांभीर्य महामहिम नरेंद्र मोदी यांना समजले तेंव्हा हजारो लोक देशभरात अडकलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गोर-गरीब जनतेला मात्र आपापल्या गावाकडे परतण्याची कोणतीही संधी न देता आकस्मिक लॉकडाऊन घोषित केले आणि देशभरात लाखो लोक अडकून पडले. हातातील काम गेले , राहण्याची सोय नाही. लोक सैरभैर झाले. हातावर होम कोरंटाईनचे शिक्के मारलेले लोक गुन्हेगार झाले. पण मोदींना त्यांची दयामाया आली नाही. याचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर झाला. कारण देशातील अनेक राज्यांचे खास करून उत्तर प्रदेश, बिहार , गुजरात , मध्य प्रदेश येथील लाखो मजूर महाराष्ट्रात आणि दिल्लीत अडकून पडले. आता राजकारण पहा. हा प्रश्न बिहार , महाराष्ट्र आणि दिल्लीचा असल्याने सरकारला या राज्यात t अडकून पडलेल्या लोकांची विशेष काळजी दिसली नाही. हे लोक पायी गावाकडे निघाले.

विशेष म्हणजे या लोकांची दुर्दशा आणि त्यांची गावाकडची ओढ लक्षात घेऊन त्यांना आपापल्या राज्यात पाठविण्याची सुविधा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली खरी पण उत्तर प्रदेश, गुजरात , आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याच लोकांना आपल्या घरात घेण्यास विरोध केला आणि केंद्र सरकारनेही या राज्य सरकारांना सांगितले कि , त्यांचा खाण्या-पिण्याचा , राहण्याचा खर्च केंद्र सरकारच्या फंडातून करावा . तेंव्हा केंद्राच्या या टेकूमुळे तेलंगाना , महाराष्ट्र सरकारने पुढे येऊन घराकडे निघालेल्या या मजुरांना आहेत त्याच ठिकाणी राहण्याची विनंती केली कारण मोदी सरकारने ही बातमी समजताच त्यांना जिथल्या तिथे थांबविण्याचे आदेश दिले होते.

मोदी सरकारच्या दुसऱ्या निर्णयानेही निर्माण झाला असंतोष….

अशा पद्धतीने तब्बल २१ दिवस हे मजूर नाईलाजाने होते तिथेच थांबले.  दरम्यान १४ एप्रिल रोजी राष्ट्रीय लॉकडाऊन चा पहिला टप्पा संपत असताना मोदी साहेबांनी ११ एप्रिलला सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला तेंव्हा लोकांना वाटले कि , मोदी साहेब   १२  तारखेला आपल्याला म्हणजे राष्ट्राला उद्धेशून भाषण करतील परंतु पीएमओ कार्यालयाने अधिकृत ट्विट केले कि , मोदी साहेब १२ तारखेला बोलणारच नाहीत. मग ते १३ एप्रिलला बोलतील असे वाटले परंतु सांगण्यात आले कि मोदी १४ तारखेला १० वाजता बोलतील. तेंव्हा खासकरून देशात अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या बाहेरच्या लोकांना वाटले कि, मोदी साहेब एक-दोन दिवस ट्रेनला परवानगी देतील आणि मग पुन्हा नव्या लॉक डाऊनचा कार्यक्रम घोषित करतील. त्याचे कारण असे होते कि , लॉकडाऊनच्या काळातही रेल्वेकडून १५ एप्रिलनंतरच्या प्रवासासाठी बुकिंग चालूच होतं. अगदी काल-परवापर्यंत हे बुकिंग सुरु होतं. १५ एप्रिल ते ३ मे या दरम्यानच्या काळातल्या प्रवासासाठी ३९ लाख तिकीटं बुक झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आपण आपल्या राज्यात जाऊ शकणार असा विश्वास या मजुरांना वाटत होता.

दरम्यान एबीपी माझाचे उस्मानाबादचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी खात्रीलायक सूत्राच्या मदतीने “जनसाधारण स्पेशल”  ट्रेन चालविण्यात येणार असल्याची बातमी दिली. मुळात राहुल कुलकर्णी हा पत्रकार बातमी पक्की असल्याशिवाय कधीही देत नाही. त्यामुळे त्याची सकाळी ९ वाजेपर्यंत बातमी खरीच होती ती मोदींनी सकाळी १० वाजता बदलून टाकली. म्हणजे खोटी ठरवली. खरे तर मोदींच्या भाषणानंतर राहुलची बातमी संपली होती. त्यामुळे राहुलच्या म्हणजेच एबीपी माझाच्या बातमीमुळे बांद्र्यात लोक आले हे म्हणणे हास्यास्पद आहे.

तात्पर्य राहुल कुलकर्णी , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा नक्कीच मोठा नाही  कि, त्यांच्या १० वाजताच्या भाषणाकडे दुर्लक्ष करून लोक राहुलची मराठीतील बातमी लक्षात ठेवून बंद्र्याकडे निघाले.

हा तर महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचा डाव…

मुळात या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला अडचणीत आणण्याचा हा मोठा डाव आहे. अर्थात हे उद्धव ठाकरे , शरद पवार यांना समजलेही आहे पण या विषयावर आदित्य ठाकरे यांनी तोफ डागली आहे. या मागचे हे राजकरण समजून घेण्याची गरज आहे. आणि केंद्र सरकारला जर बांद्र्याच्या गर्दीला जबाबदार  धरून गुन्हाच दाखल करायचा असेल तर रेल्वे मंत्र्यांवर करावा कारण जर रेल्वे सुरूच करायच्याच नव्हत्या तर रेल्वे तिकिटाचे बुकिंग का केले ? शिवाय या पेक्षाही मोठा दंगा , जाळपोळ मजुरांनी गुजरातमध्ये केली पण त्याचा इतका बोभाटा करण्यात आला नाही पण केवळ आम्हाला आमच्या गावाकडे जाऊ द्या या मागणीसाठी आलेल्या लोकांचे मोठे भांडवल करण्यात आले या लोकांना महाराष्ट्र पोलिसांनी टोले  लागवल्यानंतर एरवी देशाचे गृहमंत्री अमित शहा कुठे गेले ? असा प्रश्न पडलेला असतानाच अमित शहा अचानक फोनवरून प्रकट झाले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची बातमी आली. विशेष म्हणजे हे तेच अमित शहा आहेत ज्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री होण्यापूर्वी नंबर नव्हता  पण अचानक परप्रांतीयांच्या निमित्ताने त्यांना उद्धव ठाकरे यांचा नंबर अखेर मिळाला. हेच अमित शहा या मजुरांना युपी, बिहार , गुजरात मध्ये घेऊन जाण्यासाठी विशेष रेल्वे पाठविण्याविषयी त्यांच्या मोदी साहेबांचे मन का वळवीत का नाहीत ? किंवा उद्धव ठाकरे यांना फोन करण्यापेक्षा मोदींना फोन का करीत नाहीत ? असा प्रश्न सहजच निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

प्रियांका गांधी यांचे महत्वाचे ट्विट…

याबाबतीत कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केलेले दोन्हीही ट्विट महत्वाचे आहेत. त्यांचे पहिले ट्विट होते कि , लॉकडाऊनच्या काळात मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांची सेवा बिलाअभावी खंडित करू नये , असे झाले असते तर  अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांचे मोबाईल बंद पडले नसते आणि ते आपापल्या कुटुंबियांच्या संपर्कात राहू शकले असते. आपल्या दुसऱ्या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे कि,

“आख़िर हर बार हर विपत्ति गरीबों और मजदूरों पर ही क्यों टूटती है? उनकी स्थिति को ध्यान में रखकर फैसले क्यों नहीं लिए जाते? उन्हें भगवान भरोसे क्यों छोड़ दिया जाता है? लॉकडाउन के दौरान रेलवे टिकटों की बुकिंग क्यों जारी थी? स्पेशल ट्रेनों का इंतजाम क्यों नहीं किया गया? उनके पैसे खत्म हो रहे हैं, स्टॉक का राशन खत्म हो रहा है, वे असुरक्षित महसूस कर रहे हैं-घर गाँव जाना चाहते हैं। इसकी व्यवस्था होनी चाहिए थी। अभी भी सही प्लानिंग के साथ इनकी मदद की व्यवस्था की जा सकती है। मजदूर इस देश की रीढ़ की हड्डी हैं।  @narendramodi  जी भगवान के लिए इनकी मदद कीजिए.”

पण हे ऐकतील ते विश्वभूषण पंतप्रधान नरेंद्र मोदी कसले?

#बाबा गाडे , संस्थापक संपादक , महानायक ऑनलाईन, औरंगाबाद.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!