#CoronaVirusEffect : प्रेमाने ऐकत नसाल तर घराबाहेर पडल्यास, दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ , या मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा….

कोरोनाचा संसर्ग देशभरात वेगान वाढताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत ५१० हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवणं आणि घरातून बाहेर न पडण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. या आदेशाचं पालन राज्य सरकारनं आपल्या राज्यात योग्य पद्घतीनं अंमलात आणण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन घोषणेनंतर तेलंगणा सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता तेलंगणातील नागरिकांनी घराबाहेर पडल्यास दिसताच क्षणी गोळी घालण्याचे आदेश देऊ असा इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नागरिकांना इशारा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान तेलंगणामध्ये ३६ जण कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. तर राज्यातील १९ हजारहून अधिक लोकांवर प्रशासनाची नजर आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव टाळण्यासाठी तेलंगणा सरकारनं केंद्राच्या निर्देशाची अंमलबजावणी केली आहे. देशभरात सर्व ठिकाणी लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मात्र तरीही नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा तेलंगणा सरकारनं दिला आहे. लोक जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर येतात पण नियंमांचं पालन करत नाहीत. गर्दी करतात त्यामुळे अनेक शहरांमध्ये दुकानाबाहेर चौकोनी बॉक्स लोकांना उभं राहण्यासाठी आखण्यात आले आहेत. मात्र तेलंगणामध्ये सरकारनं घराबाहेर पडूच नये असा इशारा दिल्यानं नागरिकांच्या मनातही आता धास्ती आहे. आधीच कोरोनाची भीती आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं व्यक्तव्य मात्र देशभरात चर्चेचा विषय बनला आहे.