मनसेच्या नव्या ध्वजाला संभाजी ब्रिगेडचा विरोध काय म्हणून ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंडयावर वापरलेल्या राजमुद्रेवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. मनसेच्या मुंबईत सुरु असलेल्या राजव्यापी अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंडयाचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मनसेच्या झेंडा बदलाविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले , शिवजयंतीच्या वेळी हा झेंडा आपण बाहेर काढायचा असं सहा वर्षांपूर्वीच मनात होतं. गेल्या वर्षभरापासून आपण बदल केला पाहिजे असं माझ्या मनात होतं. आत्ताची परिस्थिती आणि झेंड्याचा रंग याची सांगड घालण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. मात्र हा निव्वळ योगायोग आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने हा झेंडा आणायचा होता तो मी सगळ्यांसमोर ठेवला असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. तो हाती घ्याल तेव्हा तो कुठेही वेडावाकडा पडलेला दिसता कामा नये असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही. त्यावेळी पक्षचिन्ह असलेला झेंडा वापरायचा.अशी भूमिका राज ठाकरे यांनी यावेळी जाहिर केली असली तरी या विषयावरून वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान मनसेच्या नव्या झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. संभाजी ब्रिगेडने मनसेने झेंड्यात राजमुद्रेचा वापर केल्याने विरोध दर्शवला आहे. राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करावी अशी मागणी करणारं पत्र त्यांनी पुणे पोलिसांकडे दिलं आहे. गुन्हा दाखल न केल्यास संभाजी ब्रिगेड स्टाइलने आंदोलन केलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
पुणे पोलिसांना दिलेल्या या पत्रात संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे कि , ‘कोणत्याही राजकीय पक्षाने शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करणं चुकीचं असून प्रांत, भाषा, जात-धर्म यावर आधारित राजकारण करणाऱ्या मनसे राज ठाकरे यांना राजमुद्रेचा वापर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मनसेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करत आहोत. राज ठाकरे यांच्याविरोधातही राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाइलने आंदोलन केलं जाईल’.
संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे यांनी म्हटले आहे कि , छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे आहेत. त्यांनी लोककल्याणाकारी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य चालवण्यायाठी त्यांनी राजमुद्रेची निर्मिती केली. राजमुद्रा ही प्रशासकीय बाब आहे. महाराजांच्या काळात राजमुद्रा पत्रावर उमटत नव्हती किंवा राजमुद्रेचा शिक्का मारला जात नव्हता तो पर्यंत तो व्यवहार अधिकृत मानला जात नव्हता. इतकी ताकत त्या राजमुद्रेमध्ये आहे असे संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले. आज मनसेने भगव्या झेंडयावर राजमुद्रा उमटवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खून केला आहे. हा शिवद्रोह आहे. मतांचा जोगवा मागण्यासाठी जातीचे रंग बाजूला ठेऊन १४ वर्षात राजकीय जहाज बुडाल्यानंतर राज ठाकरेंना छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमुद्रेचा आधार घ्यावा लागला .
आमचा भगव्या झेंडयाला विरोध नाही. झेंडयावरील शिवरायांच्या राजमुद्रेचा वापर करण्याला आमचा विरोध आहे असे म्हणत त्यांनी राज ठाकरे आणि मनसे यांच्याविरोधात स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. राजमुद्रा वापरता येणार नाही असा कायदा असताना राजमुद्रा वापरली जातेय. त्यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संतोष शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ लक्ष घालून कायदेशीर कारवाई करावी.