Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भीमा कोरेगावमध्ये जे घडलं ती दंगल नव्हे तर सुनियोजित हल्ला , एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव ही दोन्ही प्रकरणं वेगळी : प्रा. जोगेंद्र कवाडे

Spread the love

भीमा कोरेगावमध्ये घडलं ती दंगल नव्हती, तर तो सुनियोजित हल्ला होता. मागील भाजप सरकारच्या काळात केलेला हा हल्ला आहे. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आहेत. त्यांचाच या प्रकरणात समावेश आहे. एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव ही दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत. एल्गार परिषदेचा भीमा कोरेगावशी काहीही संबंध नाही. या प्रकरणात शहरी नक्षलवाद हा नवा शब्द काढण्यात आला, अशी टीका जोगेंद्र कवाडे यांनी केली.

मुळात नक्षलवादाचा जन्म हा ब्राह्मणवादातून झाल्याचे  मत आमदार जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. यावेळी कवाडे यांनी भाजप ब्राह्मणवादावर बोलत नसल्याचा आरोप करत मुळावर घाव घालण्याचे  आवाहन केलं. कवाडे यांनी एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणावरुनही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले.

येणाऱ्या काळात महाविकासआघाडी सरकारमध्ये घटकपक्षांना स्थान मिळेल असा आशावादही जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, “महाविकासआघाडीच्या घटकपक्षांना भविष्यात मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले पाहिजे. आम्ही त्याबाबत आशावादी आहोत. राजकारणात आशा कधीही सोडायची नसते. आघाडीने मित्र पक्षांना सोबत घेऊन चालावे आणि आमचाही मंत्रिमंडळात विचार करावा.”महाविकासआघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या २ लाख रुपयांच्या कर्जमाफीबाबत भूमिका घेतली आहे. हे भाजपच्या सरकारलाही जमले नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने ते करुन दाखवले, असेही कवाडे यांनी नमूद केलं.

देशात लागू केला जाणारा नागरिकत्व सुधारणा  कायदा हा देशाच्याविरोधातील विघातक कायदा आहे. हा देश सर्व सामन्यांचा आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाचं विभाजन करत आहे, असाही आरोप कवाडे यांनी केला. आठवले यांची भूमिका मोदी-शाह यांनी ठरवून दिलेली असते. ते त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे मी त्यांच्याबाबत बोलणार नाही, असा टोला कवाडे यांनी रामदास आठवले यांना लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!