महाराष्ट्राचे राजकारण : शिवतीर्थावर २८ नोव्हेंबर ला उद्धव ठाकरेंचा शपथविधी , शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा
Swearing in ceremony of Uddhav Thackeray as Maharashtra Chief Minister preponed to 28th November. https://t.co/A6Ogff3ZJl
— ANI (@ANI) November 26, 2019
‘आजचा दिवस पाहायला बाळासाहेब हवे होते. आज बाळासाहेब असते तर आम्हाला आणखी आनंद झाला असता,’ अशा शब्दांत दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी दिलदारपणे शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत या निवडीची घोषणा केली. महाराष्ट्राचा कारभार योग्यरितीने हाकण्यासाठी कर्णधार म्हणून आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी सोपवत आहोत, असे शरद पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर तिन्ही पक्षांचं एकमत झालं आहे. हे तिन्ही पक्ष उद्धव यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट घेऊन आजच सत्तास्थापनेचा दावा करतील. त्यानंतर राज्यपाल उद्धव यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देतील याची आम्हाला खात्री आहे, असे पवार यांनी पुढे नमूद केले.
नव्या सरकारचा शपथविधी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवतीर्थावर करण्याचे आम्ही ठरवले आहे. हा सोहळा महाराष्ट्रातील जनतेचा आनंद सोहळा असेल. या सोहळ्याला शिवतीर्थाची जागा पुरेल का, ही माझ्या मनात शंका आहे. या निमित्ताने बदललेल्या महाराष्ट्राचे दर्शन देशाला घडेल, असा विश्वास व्यक्त करत पवार यांनी भव्यदिव्य अशा शपथविधी सोहळ्याचे संकेत दिले.
‘हे माझं सरकार’ हा विश्वास महाराष्ट्रातील तळागाळातल्या माणसालाही वाटला पाहिजे अशा पद्धतीने उद्धव ठाकरे या राज्याचं नेतृत्व करतील अशी माझी खात्री आहे. मी त्यांना या नव्या जबाबदारीसाठी मनापासून शुभेच्छा देत आहे, असे कौतुकोद्गारही पवार यांनी काढले.