Politics in Maharashtra : अजित पवार यांचा निर्णयवैयक्तिक, राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार
अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही.
हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 23, 2019
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवार यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा वैयक्तिक असून या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठींबा नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न केले जात असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. कोणाच्याही ध्यानी मणी नसताना देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे. अजित पवार यांच्या एका गटाने भाजपला पाठींबा दिल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीतील २२ आमदारांचा पाठींबा असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले. अजित पवारांचा हा निर्णय वैयक्तीक असून या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठींबा नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. राज्याच्या निवडणुकीत लोकांच्या आदेशाचा सन्मान झाला असता तर अधिक चांगलं झालं असतं असं फडणवीस यावेळी म्हणाले. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासमोर जी आव्हानं आहेत त्याचा सामना समर्थपणे करू. पाच वर्षे ताकदीनं सरकार चालवू असेही फडणवीस म्हणाले. नवं राजकारण न पटल्यानं अजित पवार यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आणि आम्ही सत्तास्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतला. खिचडी सरकार बनवण्याचा प्रयत्न होता. त्यामुळं राष्ट्रपती राजवटीची वेळ आली. महाराष्ट्राच्या जनतेनं स्पष्ट जनादेश दिला होता. पण मित्रपक्षानं वेगळी भूमिका घेतली अशी टीका त्यांनी यावेळी केली.