महाराष्ट्राचे राजकारण : शरद पवारांची राष्ट्रवादी अनुकूल तर काँग्रेसचे तळ्यात -मळ्यात …
एकीकडे पवार -मोदींच्या भेटीची चर्चा रंगलेली असतानाच दुसरीकडे शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी दिली आहे. याआधी सोमवारी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा सुरु नसल्याचं सांगितल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेची कोंडी झाली होती. त्यावर शरद पवारांना समजून घ्यायला १०० जन्म लागतील असे संजय राऊत यांनी म्हटले होते . मात्र आता शरद पवार यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा दोन ते तीन दिवसांत संपेल असं सांगत सकारात्मक संकेत दिले आहेत.
दरम्यान शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे मात्र तळ्यात -मळ्यात चालू असल्याचे सत्तेचे हे नवे समीकरण जुळणार कसे ? आणि केंव्हा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात मात्र ते कितीही आमच्याच नेतृत्वाखाली सरकार बनेल असे सांगत असले तरी अस्वस्थता कायम आहे.
आज शरद पवारांनी सांगितलं आहे की, शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात असून दोन ते तीन दिवसांत संपेल. आज सामायिक कार्यक्रम निश्चित होईल”. दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत आज बैठक पार पडणार आहे. राज्यातील सत्तास्थापनेचा पेच मुंबईत सुटत नसल्याने आता सर्व राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू नवी दिल्लीकडे सरकला आहे. राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा दोन-तीन दिवसांत सुटेल, असा विश्वास काँग्रेस आघाडीच्या उच्चपदस्थांकडून व्यक्त करण्यात येत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक दिल्लीत पार पडणार आहे.
काँग्रेसच्या होकार -नकाराकडे राष्ट्रवादीचे लक्ष , राज्यातील नेते मात्र अनुकूल
काँग्रेस नेत्या सोनीया गांधी यांनी महाराष्ट्राच्या राजकारबाबत ” नो कॉमेंट ” म्हटले असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न चालू असले तरी त्यातील अडथळे दूर झालेले नाहीत. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्यापही ठोस निर्णय घेतलेला नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रसंगी शिवसेना सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची काँग्रेसची प्राथमिक तयारी होती. मात्र, काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. हा तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. काँग्रेस नेतृत्वाने शिवसेनेला पाठिंबा देण्यास अद्यापही होकार किंवा नकार कळविलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी यांनी मंगळवारी अहमद पटेल, ए. के. अॅन्टोनी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली. सत्ता स्थापनेचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येते. काँग्रेसचे राज्यातील नेते मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल आहेत.