Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Politics of Maharashtra : फोडाफोडीच्या भीतीने काँग्रेसचे आमदार जयपूरला , काँग्रेसचीही आज बैठक

Spread the love

राज्यात गेले १५ दिवस निर्माण झालेला सत्ता पेच १३ व्या विधानसभेचा कार्यकाल संपण्यासाठी काही तास उरले असताना भाजप-शिवसेना सत्तास्थापन करणार नाही हे स्पष्ट होत आहे. यामुळे शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडत असताना विरोधी पक्षांचे आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होईल अशी भीती विरोधी पक्षांना वाटते आहे. ही परिस्थिती लक्षात घेत काँग्रेस पक्षाने आपल्या आमदारांना राजस्थानातील जयपूर येथे हलवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाने १३ व्या विधानसभेचा कार्यकाल संपत आलेला असतानाही सत्तेसाठी दावा केलेला नाही. तसेच शिवसेनाही आपल्या मागणीवर ठाम असल्याने राज्यात सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. अशात आज शेवटच्या दिवशी आमदार फोडण्याचा मोठा प्रयत्न होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. आमदार फोडण्याची सर्वाधिक भीती काँग्रेस पक्षाला असून आपल्या आमदारांची सर्वतोपरी काळजी घेण्यास काँग्रेसने सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने काही आमदारांना राजस्थानमधील एका सुरक्षित स्थळी रवानाही केल्याचे समजते. उर्वरित सर्व आमदारांना काँग्रेस राजस्थानात रवाना करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर  काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत राजकीय स्थितीचा आढावा घेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा किंवा नाही, .यावर या बैठकीच अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस काय भूमिका घेणार यावरच राज्यातील राजकीय स्थितीला दिशा मिळणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आमचे आमदार फोडण्याची दाट शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले कि , भाजपाने आमच्या अनेक आमदारांशी संपर्क सुरू केलेला असून साम, दाम दंड, भेद वापरून निवडणुकीआधीपासून हे काम सुरू करण्यात आल्याचा गौप्यस्फोट थोरात यांनी केला आहे. सत्ता स्थापनेचा पेच अधिकच वाढत गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आमदारांना फोडण्याचे प्रयत्न पुन्हा सुरु केले आहेत. राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप थोरात यांनी केलाय. महायुती म्हणून भाजप आणि शिवेसना निवडणुकीला सामोरे गेले; जनतेने त्यांना जनादेशही दिला. पण त्यांनी मित्रपक्षांना सांभाळले नाही. भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही. निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र अडचणीत आहे,असेही थोरात म्हणाले. राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जात असल्याचाही त्यांचा आरोप आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भारतीय जनता पक्ष आमचे काही आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप केला आहे. सत्तेचे समीकरण जुळवून आणण्यासाठी आमच्या काही आमदारांना फोन येत आहेत. भाजपकडून त्यांना प्रलोभन दाखवले जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही भारतीय जनता पक्षावर आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, कितीही प्रयत्न झाले तरी आमचा एकही आमदार फुटणार नाही, असा बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!